प्रतिनिधी/ सांगे
कोरोना महामारीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र बऱयाच भागात नेटवर्कचा मुद्दा असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. असाच प्रकार सांगे तालुक्मयातील नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातील दुर्गम अशा साळजिणी गावात पाहायला मिळत आहे. या गावात नेटवर्कची समस्या असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
नेत्रावळीपासून 18 किलोमीटर अंतरावर वसलेला हा गाव डिजिटल युगात खूपच दूर आहे. साळजिणी गावात नेटवर्क नसल्याने मुले ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी डोंगरमाथ्यावर जात आहेत. त्यासाठी तासभर पायी चालत जावे लागते. याबाबतीत मुलांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आजुबाजूला घनदाट जंगल असल्याने तेथील रानटी जनावरांमुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून सोबत पालकांनाही डोंगरमाथ्यावर जावे लागते. पालकांचा उत्साह देखील दांडगा आहे. मुले शिकावीत, शिकून मोठी व्हावीत यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. त्यामुळे पालकांनी डोंगरमाथ्यावर आपल्या मुलांना पावसाळय़ात बसण्यासाठी उंचावर मचाणाची व्यवस्था केली आहे. मुलांनी चांगले शिकावे ही आमची इच्छा असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
येथील काही मुले आमोणे-पैंगीण येथील बलराम विद्यालयाच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुलांना नातेवाईकांकडे राहावे लागते. साळजिणीप्रमाणे नेत्रावळीत सर्वत्र नेटवर्कची समस्या कायम आहे. मात्र मुले जेथे नेटवर्क मिळते तेथे जाऊन आपला अभ्यास करत असतात. सरकारकडून जरी ऑनलाईन शिक्षणाचे समर्थन केले जात असले, तरी त्यात तथ्य दिसून येत नाही. साळजिणी येथील रहिवासी हे मुख्यत्वे अनुसूचित जमातींतील असून वीज, रस्ता, मोबाईल सेवा, रानटी जनावरे, अभयारण्य आदी समस्यांना तोंड देत जीवन जगत आहेत.