मंजूर कामे होणारच -दीपक केसरकर
‘मी मंत्री असताना पाच वर्षे मला मतदारसंघात जनतेसोबत राहता आले नाही. आता मला जनतेसोबत राहता येणार आहे.’
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहर हे माझ्या कुटुंबासारखेच आहे. या शहराच्या विकासासाठी मी 185 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामे मंजूर केली आहेत. ही सर्व विकासकामे
पूर्ण केली जातील. कुठलेही राजकारण न आणता शहराचा विकास केला जाईल. नगराध्यक्ष संजू परब यांनी विकासासाठी माझ्या संपर्कात राहावे. मोनोरेल, मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल व अन्य प्रकल्पांसाठी निधी देण्यात येईल, असे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पैशाचे वारेमाप वाटप झाले. मतदारांना बाऊन्सर आणून भीती दाखविण्याचा प्रकार झाला. असे राजकारण योग्य नाही. अशा
प्रवृत्तीविरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार आहे. माझा वैयक्तिक कुणावरही द्वेष, राग नाही. पण त्यांच्या प्रवृत्तीविरोधात मी आहे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, विकासकामात कुठलेही राजकारण आणू नये. मी यापूर्वी कधी विकासात राजकारण आणले नाही. शहरात वायफाय, इंटरनेट सेवा मोफत देण्यात येणार आहे. 1300 युवकांना रोजगार दिला जाणार आहे. शहरात मोनोरेलसह अन्य प्रकल्प होणार आहेत. त्यात कोणतीही आडकाठी येऊ देणार नाही.
मी नारायण राणे या व्यक्तीविरोधात मुळीच नाही. त्यांच्या प्रवृत्तीविरोधात मी होतो. मला सावंतवाडी शहरात विधानसभा निवडणुकीत 3900 मताधिक्य मिळाले. शहरातील जनता माझ्यावर प्रेम करणारी आहे. या जनतेला यावेळी बाहेरील बाऊन्सर आणून भीती दाखविण्यात आली. त्यामुळे परिवर्तन झाले. बाबू कुडतरकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांचा पराभव झाला तरी भविष्यात ते कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्षपदी बसतीलच.
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नाही
केसरकर पुढे म्हणाले, मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून मी मुळीच नाराज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. जे घडतंय ते चांगलेच आहे. मी मंत्री असताना पाच वर्षे मला मतदारसंघात जनतेसोबत राहता आले नाही. आता मला जनतेसोबत राहता येणार आहे. मी आमदार असतांनाही दहशतवादाविरोधात होतो. त्यामुळे नारायण राणे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी मला पदाची आवश्यता नाही.
उमेश यादवप्रकरणी राजकारण नको
केसरकर म्हणाले, सावंतवाडी शहरातील उमेश यादव या तरुणाने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदतीचा हात दिला आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या विषयावर भाष्य करणे योग्य नाही. यावेळी जि. प. सदस्या रोहिणी गावडे उपस्थित होत्या.
13 जानेवारीपासून दौऱयावर
केसरकर म्हणाले मी, मतदारसंघात 13 जानेवारीपासून गाववार दौरे करणार आहे. तसेच शहरात प्रभागवार नागरिकांच्या गाठीभेठी घेणार आहे. 13 जानेवारीला दोडामार्ग येथे पाणीप्रश्नी बैठक व नंतर सावंतवाडीत पाणीप्रश्नी बैठक घेतली जाणार आहे.