कर्नाटकातील कलबुर्गी येथील एक शास्त्रज्ञ वासुदेव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या टेरेसवर फुलविलेली ‘सेंद्रीय बाग’ पंचक्रोशीतील साऱयांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. सध्याच्या कोरोना उद्रेकाच्या काळात साऱयांना ‘शुद्ध’, अर्थात खत किंवा कीटनाशक विरहित आहाराचे महत्व पटले आहे. त्यामुळे घरच्या घरी स्वच्छ अन् ताज्या भाज्या मिळविण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या भाज्यांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढल्याने नाईक यांनी हा प्रयोग करून पहाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी घरगुती साधनांचा उपयोग केला. घरात उपयोंगाविना पडलेल्या प्लस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, छोटी भांडी, मातीच्या कुंडय़ा इत्यादींमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या रोपांची आणि भाज्यांची लागवड केली. अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यांची टेरेस हिरवीगार दिसू लागली. त्यांनी आपल्या इतर रिकाम्या जागेतही अशा प्रकारची लागवड केलेली आहे. त्यामुळे आपल्या घराचा कायापालट झाल्याचे ते म्हणतात. त्यांच्या पिकांमध्ये गाजर, कारले, लिंबू, तुळस, कढिलिंब, ब्रम्ही, भेंडी, मोहरी व काही विदेशी भाज्यांचाही समावेश त्यांनी केला आहे.