प्रतिनिधी/ सातारा
देशातली पहिली सैनिक स्कूल ही साताऱयाची आहे. या स्कूलमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा अन् देश सेवेकरता आपल्या घरातील एकजण तरी असावे याकरता धडपडत असतात. त्याकरता दरवर्षी घेतल्या जाणाऱया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेकरता आपल्या पाल्याला बसवतात. मात्र, यावर्षी प्रथमच वेगळेच घडले. 5 जानेवारीला दिलेल्या या परीक्षेवेळीच जो प्रकार पालकांच्या आणि परीक्षार्थींच्या निदर्शनास आला त्याचा प्रत्यय निकालाच्या आठ दिवस अगोदर येवू लागला. पालकांना दिल्लीवरुन फोन येवू लागले. त्यांनी जे फोनवरुन सांगितले त्या प्रमाणेच ज्या ज्या पालकांनी दुर्लक्ष केले त्या पाल्यांचे गुण कमी झाल्याचा अनुभव प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर आला. संतप्त झालेल्या पालकांनी आपली कैफियत मांडण्याकरता सैनिक स्कूल प्रशासनाकडे गेले. परंतु सैनिक स्कूल प्रशासनाने पालकांच्याकडे ढुंकूनही न पाहिल्याने संतप्त झालेल्या पालकांनी गेटवरच रस्ता रोको केले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना दिले.
सैनिकांमध्ये उच्च पदावर सेवा करायची असल्यास त्या पद्धतीचे शिक्षण आपल्या पाल्यांना मिळावे याकरता देशातील प्रत्येकजण धडपडतो. सैनिक स्कूलमध्ये प्रवेश परीक्षा ही अत्यंत हुशार विद्यार्थ्यांकरता अतिशय कडक अशी असते. त्याकरता देशभरातूनही विद्यार्थी परीक्षेकरता बसले जातात. दरवर्षी ही परीक्षा होत असते. यावर्षीची परीक्षा 5 जानेवारीला झाली. सातारा शहरात पहिले सैनिक स्कूल आहे. या सैनिक स्कूलसह देशभरात जेवढे सैनिक स्कूल आहेत. तेवढय़ा सर्व सैनिक स्कूलमध्ये एकाच वेळेला ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेत आपला विद्यार्थी पास व्हावा त्याला प्रवेश मिळावा याकरता वर्षभर पालकवर्ग चांगल्या प्रकारचे क्लासेस व अभ्यास करुन घेतात, परीक्षेला बसवतात. मात्र, यावर्षी वेगळाच प्रकार घडला गेला.
सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश परीक्षेकरता बसलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेवेळीच त्याचा प्रत्यय आला. परीक्षेवेळी उत्तरतालिकेची कार्बन कॉपी दिली जाते ती दिली गेली नाही. मागे कोणताही पुरावा ठेवला नाही. दि. 5 जानेवारीला ही परीक्षा घेतली. परीक्षा झाल्यानंतर ज्यांनी वर्षभर तयारी केली अशी सर्वच टॉपर विद्यार्थी आपला प्रवेश झाल्यात जमा आहे असे गृहित धरुन बसले होते. परंतु गेल्या आठ दिवसांपूर्वी पालकांच्या मोबाईलवर अननोन नंबरवरुन कॉल आले. बहुतांशी सर्वच महाराष्ट्रातील पालकांच्या नंबरवर कॉल आले. दिल्ली से बात कर रहा हूँ, तुम्हारा आधारकार्ड नंबर यह है, तुम्हारे स्टुडंटका मार्क बढाना है तो पैसे डलवा दो, तुम्हारा ये ईमेल आयडी है ना, अशी काहीशी ती वाक्य होती. काही पालकांनी पुढील फोनवरील व्यक्तींची चांगलीच झाडाझडती घेतली. मात्र, जेव्हा दि. 30 रोजी रात्री निकाल जाहीर झाला. अन् तो निकाल पाहिला तेव्हा ते अचंबित झाले. प्रत्यक्षात निकालामध्ये त्यांचा मुलगा हा फोन कॉलवरुन जे सांगितले तेवढेच मार्क मिळाले होते. आणि त्यांनी केलेली बेरीज वेगळीच होती. त्यामुळे नाराज झालेल्या पालकांनी परीक्षेत काही तरी काळंबेर झालेले आहे. पैसे उकळण्याचा फंडा कोणी केला?, देशाच्या संरक्षण सेवेची वेबसाईटच हॅक कशी काय कोण करु शकते. हे एक रॅकेट असण्याची शक्यता असून किती पालक याला बळी पडले अशी शक्यता वर्तवली जात असून संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी सैनिक स्कूल प्रशासनाकडे आपली कैफियत मांडण्याकरता गेले. परंतु सैनिक स्कूल प्रशासनाकडून कोणतीही त्यांची कैफियत ऐकून न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे सैनिक स्कूल प्रशासनाचेही यात काळेबेरे आहे काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
भ्रष्टाचाराचा किडा नेमका कुठे वळवळतोय?
सैनिक म्हटल्यानंतर देशसेवा अन् शिस्त असे बरेच काही बोलले जाते. भ्रष्टाचाराला कोठेही थारा दिला जात नाही असाही दावा होतो. मात्र, देशाचे सैनिक घडवणाऱया शाळेच्या प्रवेश परीक्षेवेळीच नेमकी वेबसाईट हॅक करण्याचा प्रकार कसा काय होवू शकतो. पालकांना जे फोन आले त्या फोनमध्येही सैनिक विभागातूनच बोलतोय असे का सांगितले जात होते. त्यांना बरोबर पालकांचे नंबर कसे काय मिळाले. यामुळे भ्रष्टाचाराचा नेमका किडा कुठे वळवळतोय?, याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
पालकांनी घेतली आक्रमक भूमिका
आपल्या मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी रात्रंदिवस राबत असलेल्या पालकांनी शुक्रवारी आक्रमकपणे नाराजी व्यक्त केली. जाब विचारण्याकरता गेलेल्या पालकांना साधी विचारणाही केली नाही. त्यामुळे तेथेच गेटवर निवेदन लिहून पालकांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. परंतु सैनिक स्कूल प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तेथून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. उद्या आंदोलन करण्याचा पवित्राही पालकांनी बोलून दाखवला.