वकिलांनाच प्रवेश : कामकाजावर मर्यादा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे तब्बल तीन महिने न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. केवळ महत्त्वाचे खटले ऑनलाईनद्वारे निकालात काढले जात होते. मात्र, आता सोमवारपासून न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे. न्यायालये सुरू असली तरी केवळ वकिलांनाच आत प्रवेश राहणार आहे. दिवसभरात 30 खटल्यांचे कामकाज करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
कोरोनामुळे न्यायालयीन कामकाज पूर्ण ठप्प झाले होते. दिवाणी तसेच इतर न्यायालयाचे कामकाज बंद होते. केवळ जामीन देणे तसेच इतर अत्यंत महत्त्वाचे कामकाज सुरू होते. त्यामुळे पक्षकारांनाही त्रास सहन करावा लागला. ऑनलाईनद्वारे न्यायालयीन कामकाज सुरू होते.
आता सोमवारपासून न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे. काही मर्यादा घालूनच न्यायालयीन कामकाज सुरू करण्यास उच्च न्यायालयाने मुभा दिली आहे. सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क आणि सॅनिटायझर तसेच कोरोनाचे इतर नियम काटेकोरपणे पाळावे आणि कामकाज करावे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयीन कामकाज सुरू होणार असल्याने आता वकिलांबरोबरच पक्षकारांनाही दिलासा मिळाला आहे.