महानगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिकांची गैरसोय : स्वच्छतागृह खुले करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात येणाऱया नागरिकांसाठी विविध ठिकाणी ‘पे ऍण्ड यूज स्वच्छतागृहे’ सुरू करण्यात आली आहेत. राणी चन्नम्मा चौकात देखील स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मात्र स्वच्छतागृहाचे काम पूर्ण होऊन 3 महिने उलटले तरी अद्याप खुले करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, स्वच्छतागृह वापरासाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
बाजारपेठेत खरेदीसाठी व विविध कामानिमित्त हजारो लोक येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका आणि प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरात येणाऱया नागरिकांना मुख्यता स्वच्छतागृहाची अडचण भासते. त्यामुळे स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत अशी मागणी सातत्याने होत असते.
शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी स्वच्छतागृहे आवश्यक आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून विविध ठिकाणी ई-टॉयलेट्स आणि पे-ऍण्ड यूज स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. बाजारपेठेत काही ठिकाणी ही स्वच्छतागृहे सुरू आहेत. राणी चन्नम्मा चौकाशेजारी नव्याने स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. सदर स्वच्छतागृहाची उभारणी करून 3 महिने उलटले तरी स्वच्छतागृह नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले नाही.
राणी चन्नम्मा चौकात विविध भागातील नागरिक येत असतात. जवळच न्यायालय आवार, जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी रुग्णालय आणि सरकारी पॉलीटेक्निक आदीसह खासगी कार्यालये व रुग्णालये आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ नेहमी असते. या ठिकाणी बसथांबे असल्याने प्रवासीदेखील मोठय़ा प्रमाणात येत असतात. त्यामुळे या परिसरात ‘पे ऍण्ड यूज स्वच्छतागृहाची’ उभारणी करण्यात आली आहे. पण स्वच्छतागृह वापरासाठी खुले नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाने सदर स्वच्छतागृह नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.