प्रतिनिधी/ फलटण
शेतकऱयांच्या विविध मागण्यासाठी माजी खा. राजू शेट्टी यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याच्या केलेला आवाहनास प्रतिसाद म्हणुन फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी 11.00 वा फलटण- लोणंद मार्गावरील जिंती नाक्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान फलटण शहर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन अटक केली. काही वेळानंतर सर्व आंदोलकांची मुक्तता केली. फलटण -लोणंद मार्ग काही वेळ बंद असल्याने पूर्णतः वाहतुक ठप्प झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.
शेतकऱयांना दिवसाला 10 तास वीज द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी उपोषण सुरू केलेले आहे. त्यात सरकारने आंदोलनाची दखल घेतली नसल्याने राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा राजु शेट्टी यांनी करताच फलटण तालुक्यात त्याचे पडसाद पाहवयास मिळाले. जिंती नाका येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी फलटण पुणे मार्गावरील जिंती नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.
विजबिल योग्य रिडींगप्रमाणे मिळावे, वीज तोडणी त्वरित थांबवावी, पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, वीज बील वसुलीची पठाणी पद्धत बंद करावी, विजेच्या तारांमुळे शेतातील पिकांचे झालेले नुकसान भरपाई त्वरित मिळावी, शेतकऱयांची वापरात आणत असलेल्या जमिनीची मासिक भाडे संबधित शेतकऱयांना द्यावे आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, स्वाभिमानी पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, उपाध्यक्ष शकील सिकंदर मणेर, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, युवा आघाडी अध्यक्ष प्रमोद गाडे तसेच निखिल नाळे, अमित बैरागी, शंकरराव बोंद्रे, प्रल्हाद अहिवळे, दंडीले यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.