संसदेत गडकरींनी मांडला रोडमॅप : 20 तासांत मुंबईतून श्रीनगरला पोहोचता येणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी मंगळवारी संसदेत देशातील रस्त्यांसंबंधी रोडमॅप मांडला आहे. 2024 पूर्वी देशातील रस्त्यांना अमेरिकेतील रस्त्यांसारखे करण्यात येईल. तर डिसेंबरपर्यंत दिल्लीहून अनेक शहरे केवळ 2 तासांच्या अंतरावर असणार आहेत. याचबरोबर श्रीनगर ते मुंबईदरम्यान रस्तेप्रवासाचा कालावधी केवळ 20 तासांचा राहणार असल्याची घोषणा गडकरींनी केली आहे. याचबरोबर पुढील दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची किंमत ही पेट्रोल वाहनांइतकीच होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘अमेरिकेचे रस्ते अमेरिका श्रीमंत असल्याने चांगले नाहीत. येथील रस्ते चांगले असल्याने अमेरिका श्रीमंत आहे’ असे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी म्हटले होते. 2024 साल संपण्यापूर्वी भारताचा रोड इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकेच्या तोडीचे असणार आहे. माझ्यासोबत तामिळनाडूचा एक हुशाल युवक काम करतोय. यापूर्वी तो जागतिक बँकेत काम करत होता. त्याने सुचविलेल्या कल्पनेनंतरच ग्रीन हायवेवर काम सुरू करण्यात आल्याचे गडकरींनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये हजारो कोटींचे प्रकल्प
केवळ जम्मू-काश्मीरमध्येच 60 हजार कोटींच्या निधीतून रस्त्यांचे काम सुरू आहे. जोजिला भुयारावर सुमारे 1 हजार कर्मचारी शून्यापेक्षा कमी तापमानावर सातत्याने काम करत आहेत. 2026 साली पूर्ण करण्याचे लक्ष्य 2024 पूर्वी गाठण्याचा प्रयत्न आहे. मनालीमध्ये अटल भुयार निर्माण करण्यात आले आहे. पूर्वी तेथील प्रवासाकरता साडेतीन तासांचा कालावधी लागत होता. आता केवळ 8 मिनिटात लोक पोहोचत आहेत. लडाख लेहपासून थेट कारगिल, कारगिलपासून झेरमोर आणि झेरमोरपासून श्रीनगर, श्रीनगरपासून जम्मूदरम्यान मोठा महामार्ग तयार करत आहोत, यात पाच भुयारांची निर्मिती केली जातेय. चालू वर्ष संपण्यापूर्वी श्रीनगरहून मुंबईपर्यंत केवळ 20 तासांमध्ये पोहोचता येईल असे गडकरी यांनी म्हटले आहे.
दिल्लीशी अनेक शहरे जोडली जाणार
डिसेंबरपूर्वी दिल्लीपासून अनेक शहरे 2 तासांच्या अंतरावर असणार आहेत. दिल्लीहून जयपूर 2 तासांत, दिल्लीहून हरिद्वार 2 तासांमध्ये, दिल्ली-देहरादून 2 तासांत, दिल्लीहून जयपूर हे अंतर 2 तासांमध्ये, दिल्ली-अमृतसर प्रवास 4 तासांमध्ये, दिल्ली-मुंबई प्रवास 12 तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्येही मोठय़ा प्रमाणावर कामे सुरू आहेत. चेन्नईपासून बेंगळूरमध्ये देखील 2 तासांमध्ये पोहोचता येईल. रस्त्यांच्या विकासाची ही यादी मोठी असल्याचे उद्गार गडकरींनी काढले आहेत.
इलेक्ट्रिक ऑटोमोबाइलचा खर्च होणार कमी
तंत्रज्ञान आणि ग्रीन फ्युएलमध्ये वेगाने प्रगती झाल्याने इलेक्ट्रिक ऑटोमोबाइलचा खर्च कमी होणार आहे. यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये पेट्रोलद्वारे धावणाऱया वाहनांइतकी इलेक्ट्रिक वाहनांची किंमत होणार आहे. लिथियम आयन बॅटरीच्या किमती जलदपणे कमी होत आहेत. आम्ही झिंक-आयन, ऍल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी विकसित करत आहोत असे गडकरींनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी हायड्रोजन तंत्रज्ञान अवलंबिण्याचे आवाहन केले. खासदारांनी स्वतःच्या मतदारसंघात सांडपाण्याला हरित हायड्रोजनमध्ये रुपांतरित करण्याचा प्रकल्प आणावा. हायड्रोजन सर्वात स्वस्त इंधन पर्याय ठरणार असल्याचे गडकरी म्हणाले.
60 किलोमीटरमध्ये एकच टोलनाका
आगामी काळात महामार्गावर प्रवास करणे स्वस्त होणार आहे. सरकार एका निश्चित मर्यादेत एकदाच टोल वसूल करणार आहे. टोलनाक्यानजीक राहणारे आणि सातत्याने महामार्गावर प्रवास करणाऱया स्थानिक लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आहे. गडकरींनी लोकसभेत यासंबंधी माहिती दिली आहे. तर स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना पुढील 3 महिन्यांमध्ये लागू होणार आहे. सरकार आगामी 3 महिन्यांमध्ये देशातील टोलनाक्यांची संख्या कमी करणार आहे. 60 किलोमीटरच्या कक्षेत एकच टोलनाका कार्यरत असेल.