प्रतिस्पर्ध्यांना 110 धावांनी नमवले, अर्धशतकवीर यास्तिका भाटिया सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
यास्तिका भाटियाचे (80 चेंडूत 50) संयमी अर्धशतक आणि स्नेह राणाच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा तब्बल 110 धावांनी धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाअपेक्षा आणखी पल्लवित केल्या. या लढतीत मधल्या षटकात झालेल्या पडझडीतून सावरत भारताने निर्धारित 50 षटकात 7 बाद 229 धावा केल्या तर प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव 40.3 षटकात अवघ्या 119 धावांमध्येच खुर्दा झाला. भारताचा हा स्पर्धेतील तिसरा विजय असून यामुळे संघाची धावसरासरी देखील सुधारली आहे.
भारतीय संघातर्फे यास्तिका भाटियाने 80 चेंडूत 50 धावांची संयमी खेळी साकारली. शिवाय, तिला स्नेह राणा (27), पूजा वस्त्रकार (30) यांनी समयोचित साथ दिली. शफालीने 42 चेंडूत 42 तर स्मृती मानधनाने 51 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ विजयापासून कित्येक कोस दूर राहिला. स्नेह राणाने गोलंदाजीतही कमाल करत 30 धावात 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
या लढतीत मध्यमगती गोलंदाज मेघना सिंगऐवजी वरिष्ठ फिरकीपटू पूनम यादवला (1-25) खेळवण्याचा निर्णय सार्थ ठरला. संथ स्वरुपाची खेळपट्टी असल्याने दोन्ही बाजूंनी फिरकीपटू तैनात केल्यानंतर बांगलादेशचा संघ त्यावर सातत्याने झगडत राहिला. एकवेळ तर 25 षटकात 69 धावांमध्येच त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. लता मोंडल (24) व सलमा खातून (32) यांची 40 धावांची भागीदारी झुलन गोस्वामीने संपुष्टात आणली. झुलनने सलमाला बाद केले तर वस्त्रकारने काही षटकानंतर मोंडलची खेळी संपुष्टात आणली. झुलन (2-19) व वस्त्रकार (2-26) यांनी एकत्रित 4 गडी बाद केले तर उर्वरित बळी फिरकीपटूंनी घेतले.
स्मृती-शफालीची 74 धावांची सलामी
तत्पूर्वी, स्मृती मानधना (30) व शफाली वर्मा (42) यांनी 74 धावांची सलामी दिली. मात्र, रितू मोनी (3-37) व नाहिदा अक्तेर (2-42) यांनी एकत्रित 5 बळी घेतल्यानंतर भारताची मधल्या षटकात बरीच पडझड झाली. मानधनाने अक्तेरच्या गोलंदाजीवर फरजानाकडे सोपा झेल दिला तर पुढील षटकात मोनीने 2 चेंडूत 2 फलंदाजांना बाद केल्यानंतर भारताची 15.4 षटकात 3 बाद 74 अशी स्थिती झाली. शफाली वर्माला निगारने यष्टीचीत केले तर कर्णधार मिताली राजला (0) गोल्डन डकला सामोरे जावे लागले.
नंतर उपकर्णधार हरमनप्रीत कौर व यास्तिका यांनी 70 चेंडूत 34 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यास्तिका व रिचा घोष (26) यांनी 54 धावा जोडत संघाला दीडशे धावांचा टप्पा पार करुन दिला. अर्धशतक साजरे केल्यानंतर यास्तिका पॅडल स्वीप करण्याच्या प्रयत्नात बाद झाली. रिचाने यष्टीमागे झेल दिला. 44 व्या षटकात 6 बाद 180 अशी स्थिती असताना क्रीझवर एकत्रित आलेल्या वस्त्रकार व राणा यांनी 38 चेंडूत जलद 48 धावांचे योगदान दिले. या दोघींनी उत्तम फटकेबाजी केल्यामुळे भारताला शेवटच्या 10 षटकात 64 धावांची लयलूट करता आली.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 50 षटकात 7 बाद 229 (यास्तिका भाटिया 80 चेंडूत 2 चौकारांसह 50, शफाली वर्मा 42 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 42, स्मृती मानधना 51 चेंडूत 3 चौकारांसह 30, पूजा वस्त्रकार 33 चेंडूत 2 चौकारांसह 30, स्नेह राणा 23 चेंडूत 2 चौकारांसह 27. अवांतर 8. रितू मोनी 3-37, नाहिदा अक्तेर 2-42, जहानारा आलम 1-52).
बांगलादेश ः 40.3 षटकात सर्वबाद 119 (सलमा खातून 35 चेंडूत 4 चौकारांसह 32, लता मोंडल 46 चेंडूत 2 चौकारांसह 24, जहानरा नाबाद 11. अवांतर 6. स्नेह राणा 10 षटकात 4-30, पूजा वस्त्रकार 2-26, झुलन गोस्वामी 7.3 षटकात 2-19, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव प्रत्येकी 1 बळी).
शेवटचा साखळी सामना रविवारी, मात्र, उद्याच उपांत्य फेरीचे चित्र सुस्पष्ट होणार!
या स्पर्धेत साखळी फेरीअखेर गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असून भारतीय संघ सध्या 6 सामन्यात 6 गुणांसह तिसऱया स्थानी विराजमान आहे. भारताची शेवटची साखळी लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवार दि. 27 रोजी होईल. मात्र, विंडीज-दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत झाल्यानंतर त्याचवेळी भारतासाठी उपांत्य फेरीचे चित्र बऱयापैकी सुस्पष्ट होणार आहे. सध्या दुसऱया स्थानी असलेल्या बहरातील दक्षिण आफ्रिकन संघाने विंडीजला नमवले तर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणे अधिक सहजसोपे होणार आहे. मात्र, विंडीजने द. आफ्रिकेला धक्का दिला तर ते 8 गुणांसह तिसऱया स्थानी जातील व भारताला आपल्या शेवटच्या लढतीत विजय संपादन करण्याबरोबरच अन्य निकालांवरही अवलंबून रहावे लागू शकते.
कोट्स
तिसऱया स्थानी फलंदाजीची संधी लाभेल, याची कल्पना असल्याने मी प्रथमश्रेणी स्तरावर याच क्रमांकावर अधिक फलंदाजीला प्राधान्य दिले आणि त्या अनुभवाचा मला इथे लाभ झाला. ज्यावेळी खेळपट्टी फलंदाजीला पोषक असत नाही, त्यावेळी एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर आणि स्ट्राईक रोटेट करण्यावर माझा अधिक भर असतो. यापुढेही हाच गेमप्लॅन कायम असेल.
-सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू यास्तिका भाटिया
यास्तिका भाटियाचे शानदार अर्धशतक आणि स्नेह राणा-पूजा वस्त्रकार यांची भागीदारी आमच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरली. स्नेह-पूजाच्या भागीदारीमुळे आम्ही 230 धावांचा टप्पा सर करु शकलो. आम्ही या स्पर्धेत ख्राईस्टचर्चमध्ये आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे द. आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या लढतीत सर्व आघाडय़ांवर आम्हाला दक्ष रहावे लागेल.
-भारतीय कर्णधार मिताली राज
ब्लर्ब
भारताची शेवटची साखळी लढत रविवारी द. आफ्रिकेविरुद्ध होईल.
स्पर्धेतील उर्वरित सामन्यांची रुपरेषा
तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण
24 मार्च / द. आफ्रिका वि. विंडीज / पहाटे 3.30 वा. / वेलिंग्टन
24 मार्च / इंग्लंड वि. पाकिस्तान / सकाळी 6.30 वा. / ख्राईस्टचर्च
25 मार्च / ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश / पहाटे 3.30 वा. / वेलिंग्टन
26 मार्च / न्यूझीलंड वि. पाकिस्तान / पहाटे 3.30 वा. / ख्राईस्टचर्च
27 मार्च / बांगलादेश वि. इंग्लंड / पहाटे 3.30 वा. / वेलिंग्टन
27 मार्च / भारत वि. दक्षिण आफ्रिका / सकाळी 6.30 वा. / ख्राईस्टचर्च
30 मार्च / पहिली उपांत्य लढत / पहाटे 3.30 वा. / वेलिंग्टन
31 मार्च / दुसरी उपांत्य लढत / सकाळी 6.30 वा. / ख्राईस्टचर्च
3 एप्रिल / अंतिम लढत / सकाळी 6.30 वा. / ख्राईस्टचर्च