पश्चिम बंगाल – निवडणूक आयोगाने उचलले पाऊल
निवडणूक आयोगाने कोलकात्यातील 8 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक अधिकाऱयांना हटविले आहे. या मतदारसंघांमध्ये 26 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आयोगाच्या एका अधिकाऱयाने बुधवारी यासंबंधी माहिती दिली आहे.
चौरंगी, एंटाली, भवानीपूर, बेलियाघाट, जोडासांको, श्यामपुकुर, काशीपूर-बेलगछिया आणि कोलकाता पोर्ट विधानसभा मतदारसंघांमध्ये नव्या अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक अधिकाऱयांची बदली एका नियमित प्रक्रियेच्या अंतर्गत झाली आहे, कारण ते तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून याच पदावर होते अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब यांनी दिली आहे. तर या अधिकाऱयांनी तृणमूल काँग्रेसची बाजू घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या असा दावा केला जात आहे.
कोलकाता पोर्ट विधानसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर अन्य 7 मतदारसंघांमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. याप्रकरणांमध्ये अधिकाऱयांच्या बदल्यांच्या नियमाचे पालन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आयोगाने अलिकडेच शहराच्या बालीगंज मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱयासह तीन अधिकाऱयांना हटविले होते.