ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीनिमित्त आगामी 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज नागपूर येथे झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वर्धा येथे 55 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तर, गेल्या अकरा वर्षांत विदर्भामध्ये होणारे हे तिसरे संमेलन असणार आहे.
उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन जेमतेम एक महिना झाला असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आता आगामी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेचे यंदा शताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून आगामी संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान विदर्भ साहित्य संघाला देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार वर्धा येथे साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शनिवारी वर्धा येथे भेट देऊन पाहणी केली होती. आज नागपुरात झालेल्या महामंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयावर एकमत झाले. त्यानंतर वर्ध्याची औपचारिक घोषणा करण्यात आली.
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य
विदर्भ साहित्य संघाचे शाखा समन्वय सचिव प्रदीप दाते म्हणाले, विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची इच्छा संघाने प्रदर्शित केली होती. त्याला महामंड?ळाने सकारात्मक प्रतिसाद दिला. महामंडळाने संमेलन स्थळ घोषित केले असून, पुढील नियोजन सुरू करण्यात येणार आहे.