वृत्तसंस्था / यवतमाळ
महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्हय़ात सहा कोटी वर्षांपूर्वी नैसर्गिरित्या बनलेल्या एका बेझाल्ट खडकाच्या स्तंभाचा शोध लागला आहे. पृथ्वीची जडणघडण कशी झाली याचा अभ्यास करण्यासाठी हा खडकस्तंभ उपयोगी पडेल असे मत भूगर्भसंशोधकांनी व्यक्त केले. या स्तभांचा सखोल अभ्यास सुरू आहे.
यवतमाळ जिल्हय़ाच्या वाणी पांढरकवडा भागात हा स्तंभ काही दिवसांपूर्वी आढळून आला. सध्याच्या महाराष्ट्रात 6 कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला होता. त्या प्रक्रियेत या स्तंभाची निर्मिती नैसर्गिकरित्या झाली. षटकोनी आकाराचा हा स्तंभ लाव्हा रसाच्या प्रसरण-आकुंचन प्रक्रियेतून घडला असल्याची माहिती भूगर्भ संशोधकांनी दिली. याच भागात काही वर्षांपूर्वी 20 कोटी वर्षांपूर्वी बनलेले काही बहुस्तरी खडक सापडले आहेत. या कालावधीत पश्चिम घाट प्रदेशातून लाव्हा रस आताच्या यवतमाळपर्यंत वहात आला होता, असे या खडकांवरून स्पष्ट होते. त्यामुळे हे खडक महत्वाचे आहेत.
या ज्वालामुखी उद्रेकामुळे मध्य भारतात साधारणतः 5 लाख चौरस किलोमीटर आकाराची खडकाळ भूमी तयार झाली. हाच लाव्हा गुजरातपर्यंतही वहात गेला. महाराष्ट्रातील 80 टक्के खडकाळ भूमी याच उद्रेकातून तयार झाली असावी असे अनुमान अनेक संशोधकांनी बऱयाच अभ्यासाअंती काढले आहे.