पिंपरी चिंचवड/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचे ज्यांनी दोन डोस घेतले त्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
अजित पवार आज पिंपरी-चिंचवडमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या असं मत व्यक्त केलं. राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने बाहेर पडायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे १०० ते १२० दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक वागण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले.