हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा : मोसमातील एकूण पाऊस 80 इंच
प्रतिनिधी /पणजी
पावसाचा जोर आता दि. 25 जुलैपर्यंत रहाणार असून या काळात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत पावसाची सरासरी नोंद 80 इंच एवढी झाली आहे. वार्षिक सरासरी पेक्षा यंदा 16 इंच अतिरिक्त पाऊस झालेला आहे. सध्याची स्थिती अशीच राहिली तर या महिन्याच्या अखेरिस राज्यात 100 इंच पावसाची नोंद होऊ शकते.
हवामान खात्याने नव्याने जारी केलेल्या पत्रकानुसार गोव्यात येत्या दि. 25 जुलै पर्यंत वादळी वाऱयासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासात सांखळी व सांगे येथे प्रत्येकी 3 इंच पाऊस पडलेला आहे. जुने गोवे येथेही 3 इंच पाऊस पडलेला आहे. फोंडा व केपे, येथे प्रत्येकी 2.5 इंच, काणकोण, दाबोळी मुरगाव व म्हापसा येथे प्रत्येकी 1 इंच तर पणजीत अर्धा इंच पावसाची नोंद झालेली आहे.
वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस
येत्या 25 जुलैपर्यंत ताशी 40 ते 50 कि.मी. या वेगाने जोरदार वारे वाहणार आहे. मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिलेला आहे. वरील काळात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. कारण वाऱयाच्या वेग ताशी 60 ते 70 कि.मी. पर्यंत देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जुलैमध्ये मुसळधार व विक्रमी पाऊस झालेला आहे. सध्या 80 इंचापर्यंत नोंद झालेली आहे. अद्याप सव्वा दोन महिने पाऊस पडायचा असल्याने यंदाचा पाऊस हा अडचणीत आणणारा ठरणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
मुसळधार पावसाचा शेतीवर परिणाम राज्यात पावसाचा वाढता जोर शेती बागायतीवर विपरित परिणाम करणारा ठरणार आहे. राज्यातील अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. राज्यातील सुपारी बागायतीवर विपरित परिणाम झाला असून सुपारी गळून पडायला लागली आहे. उत्पादन देणारी झाडे सततच्या अखंडित पावसामुळे बुरशीजन्य रोगराई पसरत असल्याने ती धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गही अडचणीत आला आहे.