ब्रिटिशांना भारताबाहेर घालविण्यासाठी 1857 मध्ये स्वातंत्र्य युद्ध लढण्यात आले होते. या युद्धाला आता 154 वर्षे लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाच्या काही स्मृतींना उजाळा देण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्या स्थानातून या ब्रिटिश विरोधी सशस्त्र क्रांतीचा प्रारंभ झाला, तो पेशवा महाल या निमित्ताने पुन्हा सजविण्यात आला आहे. हा पेशवा महाल उत्तर प्रदेशातील ब्रह्मावर्त किंवा बिठूर या गावी आहे. त्यावषी नानासाहेब पेशवे (दुसरे) यांचा सेनापती आणि विमर्षकार तात्या टोपे यांनी या राजवाडय़ातून रणशिंग फुंकले होते.
भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या महालाकडे सरकारचे किंवा इतिहासप्रेमी लोकांचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे महालाची पडझड झाली. तसेच कालांतराने तो विस्मृतीतही गेला. तथापि आता उत्तर प्रदेश सरकारने या महालाचा जीर्णोद्धार चालविला आहे. बिठूरमधील इतर स्थानांचेही सुशोभिकरण सुरू आहे. ब्रिटिशांविरोधातील या प्रथम पण अपयशी संग्रामाची स्मृती लोकांच्या मनात कायम राहावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. 1857 च्या स्वातंत्र्य युद्धात पराभूत होईपर्यंत नानासाहेब पेशव्यांचे वास्तव्य येथे होते. बिठूर इंग्रजांच्या हाती लागल्यानंतर नातासाहेबांनी लखनौला जाणे पसंत केले.