प्रतिनिधी /कराड
गेले दीड वर्ष कोरोना महामारीमुळे पालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडला आहे. त्यामुळे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आर्थिक बचतीचे धोरण आखले आहे. प्रत्येक विभाग प्रमुखांनी अनावश्यक खर्च टाळून पालिकेच्या आर्थिक बचतीला हाभार लावावा, अशी नोटीस मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे. पालिकेच्या नव्या कामांना मंजुरी घेताना निधी उपलब्धतेचा लेखा विभागाचा अहवाल घेण्यात यावा, अशी सूचनाही केली आहे.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे पालिकेच्या कर वसुलीवर परिणाम झाला असून अन्य उत्पन्नातही घट होत आहे. त्याचा ताण पालिकेच्या तिजोरीवर आला आहे. उत्पन्न व खर्चात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेत खर्चात बचत करण्याची नोटीस मुख्याधिकाऱयांनी विभाग प्रमुखांना काढली आहे. पालिकेच्या दोन ते तीन विभागांनी एकत्र जाहिरात द्यावी. दुसऱया विभागाचे काम पालिकेतर्फ करू नये. त्यासाठीचा खर्चही टाळावा. जितका खर्च कमी करता येईल, तेवढा खर्च कमी करावा. जेथे अत्यावश्यक आहे, तेथेच विजेचे दिवे लावावेत. अनावश्यक दिवे बंद करावेत. कर विभागाने जाहिरात कराचे पैसे वसूल करावेत. मागील थकबाकी भरलेली नाही, त्या सगळ्यांचे होर्डींग्ज जप्त करावेत. गाळ्यांच्या भाडय़ाची वसुली करावी. ज्या गाळ्यांची मुदत संपली आहे, मात्र ते थकीत आहेत. त्यांच्या गाळ्यांचे फेरलिलाव काढून गाळ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. कर विभागाने रिकाम्या जागांना कर लावला आहे का, त्याची अहवाल द्यावा. अनधिकृत मालमत्ता शोधून त्यांच्यावर कायदा कलम 189 (अ) प्रमाणे कर लावावा. त्याची दक्षता घेऊन कार्यवाही करावी. कोणत्याही नवीन कामाला मंजुरी घेताना निधी आहे का, याचा लेखी विभागाकडून अहवाल घेऊनच ते काम मंजुरीसाठी द्यावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.