अतिवृष्टीचा फटका : तीन गुंठ्यातील दोडकी कुजली
वार्ताहर / बांदा:
गणेश चतुर्थीला चार पैसे मिळणार म्हणून दोडका भाजी विकण्याच्या नियोजनाने तयार केलेल्या शेतीचे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले. विक्री योग्य तयार झालेली दोडकी कुजू लागल्याने पाडलोस-माचेगावळ येथील बंटी गावडे यांचे 50 ते 60 हजारांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची दखल घेत पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. गणेश चतुर्थीकरीता मोठ्याप्रमाणात चाकरमानी गावी येतात. त्यामुळे भाजीपाला व फळांना मोठी मागणी असते. पाडलोस-माडाचेगावळ येथील बंटी गावडे या युवकाने आपल्या तीन गुंठे जागेत दोडक्याचा प्लॉट तयार केला. यासाठी खत, औषध फवारणी, मजूरी, झावळे, बियाणे आदीसाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च झाला. दोडकीचे फळ चांगले येऊन ते बाजारात विक्रीसाठी तयार झाले होते. परंतु जुलै महिन्यात सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे मिळणारे उत्पन्न मातीत गेले असल्याचे बंटी गावडे यांनी सांगितले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने कोरोना काळात उभारी घेत असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा नुकसान सहन करावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे केलेली सर्व मेहनत वाया गेल्याने प्रशासनाने याची दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.