जागतिक आरोग्य संघटनेचा महत्वपूर्ण निर्णय, लसीच्या निर्यातीचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संपूर्ण स्वदेशनिर्मित कॉव्हॅक्सिन या कोरोना लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) तातडीच्या उपयोगासाठी (इमर्जन्सी यूज) मान्यता दिली आहे. ‘आत्मनिर्भर’ भारतासाठी ही महत्वाची घटना असून दिवाळीच्या आदल्या दिवशीच हा निर्णय घेतला गेल्याने ही भारतीयांसाठी दिवाळीची भेट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या लसीची निर्मिती भारत बायोटेक या कंपनीने केली आहे.
या लसीने कोरोना विरोधात 77.8 टक्के प्रभावीशालीत्व सिद्ध केले आहे. तसेच कोरोनाच्या नव्या डेल्टा स्वरुपाविरोधातही ती 65.2 टक्के प्रभावी असल्याचे प्रयोग आणि सर्वेक्षणांमधून स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सूचना गटाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत या लसीला तातडीच्या उपयोगासाठी मान्यता देण्यावर एकमत झाले. 26 ऑक्टोबरलाही या गटाची बैठक झाली होती. तथापि, भारत बायोटेककडून आणखी माहिती मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मान्यता लांबली. तथापि, कंपनीने गटाला हवी असणारी सर्व माहिती तत्काळ पुरविल्याने बुधवारी अंतिम बैठक होऊन या लसीला जागतिक मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत फित्झर-बायोएन्टेक, ऍस्ट्रा झेनिका-एसके बायो आदी लसींना जागतिक आरोग्य संघटनेने तातडीच्या उपयोगासाठी जागतिक मान्यता दिली आहे.
अंतिम विश्लेषणही समाधानकारक
कोव्हॅक्सिन ही लस कोरोना आणि त्याचे डेल्टा स्वरुप या दोन्हींवर अतिशय प्रभावी असल्याचे तीन टप्प्यांमधील चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन भारत बायोटेकने केले आहे. कोरोना विरोधात ती 77.8 टक्के तर डेल्टाविरोधात ती 65.2 टक्के प्रभावी आहे. या लसीच्या सर्व टप्प्यांमधील चाचण्या यशस्वी झाल्याची घोषणा जूनमध्येच करण्यात आली होती.
मान्यतेस विलंब
कोव्हॅक्सिन प्रभावी असली तरीही, जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळविण्यासाठी बराच विलंब झाला. मान्यतेसाठी भारत बायोटेकने गेले सहा महिने प्रयत्न चालविला होता. भारतात या लसीला यापूर्वीच मान्यता मिळालेली होती आणि आतापर्यंत कोटय़वधी भारतीयांनी या लसीच्या दोन मात्रा (डोस) घेऊन लसीकरण प्रमाणपत्रही मिळविले आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांनीही या लसीच्या प्रमाणपत्राला मान्यता दिलेली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने या लसीच्या चाचण्या आणि प्रभाव यासंबंधी अधिक माहिती अनेकदा मागविल्याने मान्यतेस विलंब लागला. तथापि, आता मान्यता मिळाली आहे.
पंतप्रधान मोदींनीही घेतली हीच लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वदेशी कॉव्हॅक्सिन हीच लस घेतली आहे. 1 मार्च 2021 या दिवशी त्यांनी या लसीची प्रथम मात्रा दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी दुसरी मात्रा घेऊन त्यांनी स्वतःची लसीकरण प्रक्रिया पूर्ण केली होती. या लसीला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठीही त्यांनी नुकत्याच झालेल्या जी-20 परिषदेच्या निमित्ताने ते इटलीला गेले असताना प्रयत्न केले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनॉम यांची भेट घेऊन त्यांनी मान्यता देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचा आग्रह केला होता. त्यांचेही प्रयत्न आता फळाला आले आहेत.
कोव्हॅक्सिनची ‘आयुष्यवृद्धी’
भारतनिर्मित कोव्हॅक्सिन या लसीचे कार्यायुष्य (शेल्फलाईफ) 12 महिन्यांर्पंत वाढविण्यात आले आहे. यापूर्वी भारत बायोटेक या निर्मिती कंपनीने या लसीचे आयुष्य 6 महिन्यांचे असल्याचे घोषित करुन तिची विक्री आणि उपयोगासाठी अनुमती दिली होती. मात्र विविध चाचण्या, परीक्षणे आणि ‘स्थिरता’ यांच्या आधारावर आता आयुष्य 12 महिन्यांचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की ही लस 12 महिने टिकू शकते. निर्मिती झाल्यापासून लस 12 महिन्यांपर्यंत केव्हाही देता येते. त्यामुळे तिची उपयुक्तता वाढली आहे.
मान्यतेचे सुपरिणाम अनेक
ड लसीला जागतिक मान्यता मिळाल्याने तिची निर्यात सहजपणे होणार
ड या लसीचे प्रमाणपत्र मिळविलेल्यांना आता परदेश प्रवास शक्य होणार
ड विविध देश आता या लसीच्या प्रमाणपत्राला मान्यता देण्याची शक्यता
श्रीनगर-शारजा विमानसेवेत पाकचा मोडता
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नव्याने प्रारंभ झालेल्या श्रीनगर-शारजा विमानाला आपल्या वायुपरिसीमेतून प्रवास करु देण्यास पकिस्तानने नकार दिला आहे. त्यामुळे या विमानाला आपल्या गंतव्य स्थानी गुजरातवरुन जावे लागले. हा मार्ग काहीसा लांबचा आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी या विमानसेवेचा प्रारंभ केला होता. ही विमानसेवा गो-फर्स्ट (पूर्वीची गो-एअर) या कंपनीची आहे. मंगळवारी विमान श्रीनगरहून सोडण्यात आले. मात्र पाकिस्तानने त्याला आपली वायुपरिसीमा नाकारली. 31 ऑक्टोबरपर्यंत पाकच्या वायुपरिसीमेतून ही विमाने जात होती. पण अचानक पाकिस्तानने आपला निर्णय फिरविल्याचे दिसून येत आहे. पाकचे डावपेच हाणून पाडू असे भारताने यासंबंधात स्पष्ट केले असून विमानसेवा सुरुच राहणार असल्याचे प्रतिपादन केले.