प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक नुकतीच झाली आहे. राष्ट्रवादी प्रणीत सहकार पॅनेलची सत्ता आली असून यामध्ये बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार दि. 6 रोजी निवडी होणार आहेत. अध्यक्षपदासाठी नितीनकाकांसाठी वाई आणि कोरेगावातील कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. परंतु इतर इच्छूकांनी अजूनही इच्छा व्यक्त केली नसली तरीही कोणाला संधी मिळणार?, कोणाचे नाव विधान परिषदेचे सभापती रामराजेंच्या कानात पवारसाहेब सांगणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्हा बँक ही राजकारण्याचे सत्तासुत्र सहकाराचा महामेरु म्हणून पाहिली जाते. या बँकेतून राजकारणाची बिजे रोवली जातात. गावगावातल्या सोसायटय़ांच्या माध्यमातून कार्यकर्ते जोडले जातात. शेतकऱयांना जरी कर्ज पुरवठा केला जात असला तरीही शेतकऱयांचे कर्ज थकले तर हीच बँक विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून त्या शेतकऱयांच्या मालमत्तेचा लिलाव काढण्यास मागे पुढे पहात नाही. गावटगे मंडळी सोसायटीत पुढारी अन् बँकेत त्यांचे नेते असे समिकरण अलिकडच्या काळात बनू लागले आहे. याच बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. 11 जागा या बिनविरोध झाल्या तर 10 जागांवर निवडणूक झाली. 10 जागांमध्येही सहकार पॅनेलच्या चार उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला. अनेकांचे पत्ते कट झाले. तर अनेकांना डावलले गेले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना डावलल्याने त्यांनी नुकताच पक्ष विरहित मेळावा घेतला. आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीच्याच ज्ञानदेव राजंणे यांनी केला. कोरेगावातून राष्ट्रवादीच्याच एकेकाळच्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्याच शिवाजीराव महाडिक यांचा पराभव चिठ्ठीने केला. तर कारागृहातून राष्ट्रवादीच्या नंदकुमार मोरे यांचा पराभव माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केला. माणचे सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ यांचाही पराभव शिवसेनेचे शेखर गोरे यांनी चिठ्ठीने केला. असे सगळे बँकेच्या निवडणूकीत रामायण घडले. असे असताना आता अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्या निवडी दि. 6 रोजी होणार आहेत. बारामतीचा खलिता हा नेहमीप्रमाणे उशीरा येतो. परंतु आता खलिता व्हाट्सऍपद्वारे येतो की थेट विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना फोनद्वारे कानात सांगितला जातो हे येत्या काही दिवसात पहायला मिळणार आहे. तोपर्यत वाई सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेले नितीन काका पाटील हेच अध्यक्ष व्हावेत या मागणीसाठी कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी केली. तर वाई तालुक्यातील काही गावांनीही नितीन काकांनाच अध्यक्षपद द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार याकडेच लक्ष लागून राहिले आहे.