विकेंडचा परिवहनला मोठा फटका : आज बससेवा होणार सुरळीत
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठवडय़ापासून विकेंड काळात विविध मार्गावर धावणारी बससेवा ठप्प होत आहे. प्रवाशांअभावी बस बसस्थानकात थांबून असल्याचे दिसत आहे. विकेंड काळात बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय परिवहनने घेतला तरी प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बससेवा बंद ठेवावी लागत आहे. काही किरकोळ बसफेऱया वगळता बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे विकेंडचा परिवहनला मोठा फटका बसत आहे.
बसस्थानकात उचगाव, वडगाव, अनगोळ सुळेभावी, होनगा, बस्तवाड, मजगाव मन्नीकेरी, धामणे, राजगोळी, मुचंडी कुदेमणी, सांवगाव, हंदीगन्नूर, होनगा, काकती, केदनूर यासह हुबळी, चिकोडी, धारवाड, अथणी, दावणगेरी, हुक्केरी, बैलहोंगल, सौंदत्ती, गोकाक आदी बस प्रवाशांअभावी थांबून होत्या. त्यामुळे बसचालक व वाहक प्रवाशांच्या प्रतीक्षेत पहायला मिळाले. सकाळच्या सत्रात काही लांब पल्ल्याच्या बस धावल्या मात्र दुपारनंतर शुकशुकाट पसरला होता.
कोरोनामुळे परिवहन मंडळ आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहे. त्यातच मागील आठवडय़ापासून विकेंडमुळे दोन दिवसांच्या महसुलावर पाणी फिरत आहे. विकेंड काळात बाजारपेठ, सरकारी कार्यालय आणि शाळा, महाविद्यालये बंद रहात असल्याने प्रवाशांची संख्या रोडावत आहे. त्यामुळे या काळात प्रवासी मिळणे कठिण झाले आहे. दरम्यान, काही गाडय़ा रिकाम्या धावत आहेत. तर काही गाडय़ा बसस्थानकातच थांबून राहत आहेत.
शनिवार, रविवार ठप्प झालेली बससेवा सोमवारपासून सुरळीत सुरू होणार आहे. दरम्यान, शाळा महाविद्यालयांना सोमवारपासून प्रारंभ होणार असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्मयता आहे. सोमवारी सकाळी 5 वा. विकेंड कर्फ्यूचा कालावधी संपल्यानंतर सर्व प्रकारची बससेवा सुरू होणार आहे.