शेतकरी नेते सिद्धगौड मोदगी यांचा आंदोलनाला पाठिंबा : आजपासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय : जिल्हा प्रशासनाबद्दल एपीएमसी दुकानदारांत तीव्र संताप
वार्ताहर /अगसगे
गांधीनगर येथील जय किसान भाजी मार्केट विरोधात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची धार आणखी तीव्र होत आहे. आता भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष व शेतकरी नेते सिद्धगौड मोदगी यांनी सोमवार दि. 7 पासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.
रविवार दि. 6 रोजी एपीएमसीतील आंदोलनस्थळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. गेल्या चार दिवसांपासून गांधीनगर येथील खासगी भाजी मार्केट विरोधात एपीएमसी भाजी मार्केटमधील दुकानदारांनी आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत त्या खासगी भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार दुकानदारांनी केला आहे. सध्या या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असतानाच आता भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौड मोदगी यांनीही पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाची धार आणखी तीव्र झाली आहे.
गेल्या चार दिवसापासून एपीएमसीसमोर दिवसरात्र आंदोलन करत आहोत. मात्र, अद्याप याकडे जिल्हा प्रशासन किंवा अधिकारी यांनी अद्याप काहीच पाठपुरावा केला नसल्यामुळे एपीएमसीच्या दुकानदारांकडून जिल्हा प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 11 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत जय किसान भाजी मार्केट ज्या जागेत आहे, त्या जागेचा मालक 2011 साली मयत झाला आहे. त्याच्या सहीची नक्कल करून 2015-16 ला एन. ए. लेआऊट करून घेतले आहेत. आणि सरकारी कार्यालयातील कागदपत्रांची खाडाखोड करून खासगी भाजी मार्केटने परवाना घेतला आहे. याबाबत सबळ पुरावे जिल्हाधिकाऱयांना भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौड मोदगी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱयांनी एक महिन्यामध्ये याबाबत चौकशी करून योग्य कारवाई करू, असे आश्वासन दिले होते.
मात्र, अद्याप आश्वासनाची पूर्तता झाली नसून बेकायदा परवाना दिलेल्या अधिकाऱयांचे रक्षण जिल्हाधिकारी करत असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. तसेच राजकीय दबावाखाली जिल्हाधिकारी सापडले आहेत काय? असे सिद्धगौड मोदगी यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
एपीएमसी भाजी मार्केटची पाहणी
रविवारी सकाळी 8 वाजता शेतकरी नेते सिद्धगौड मोदगी यांनी एपीएमसी भाजी मार्केटमधील शेतकऱयांची भेट घेतली. आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याठिकाणी सध्या व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या भाजीपाल्याला काहीच भाव नसल्याचे मत शेतकऱयांनी मोदगी यांच्याकडे मांडले. संपूर्ण भाजी मार्केटची पाहणी केली. याठिकाणी सुसज्ज भाजी मार्केटसाठी सरकारने 80 कोटी रुपये खर्च केले आहेत. खासगी भाजी मार्केटमुळे सरकारचा पैसा वाया जात असल्याची खंत व्यक्त केली. आपण सरकारी भाजी मार्केट टिकवण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याची माहिती सिद्धगौड मोदगी यांनी दिली.
एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम
खासगी भाजी मार्केटला परवानगी देऊ नये म्हणून एपीएमसीमध्ये तीनवेळा ठराव मांडून प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. खासगी भाजी मार्केटमुळे एपीएमसीवर फार मोठा आर्थिक परिणाम झाला आहे.
आमच्या ठरावाचा पाठपुरावा प्रशासनाने केला नाही आणि लाचखोर भ्रष्ट अधिकाऱयांमुळे एपीएमसीतील दुकानदारांवर आणि एपीएमसीवर ही वेळ आली आहे, असे मत एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम यांनी मांडले.