जळगा येथे विठ्ठल-रखुमाई मंदिराचे थाटात उद्घाटन : आमदार निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर /चापगाव
सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक कार्याला एकीची सांगड महत्त्वाची असते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराजाची निर्मिती केली. त्याचपद्धतीने प्रत्येक गावात निर्माण होणारे मंदिर अथवा सार्वजनिक काम एकीने हाती घेतले पाहिजेत, तरच सर्वांगीण विकास साधता येतो. येथे सुरू असलेला जमिनीचा वाद संपुष्टात आणून सुंदर असे विठ्ठल-रखुमाई मंदिर निर्माण करण्यात आले आहे. हे या गावचे वैभव आहे, असे विचार आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी जळगा येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम कमिटीचे अध्यक्ष
परशराम ना. लाड होते.
यावेळी बोलताना भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील म्हणाले, गावाने या मंदिराची निर्मिती करून आदर्श राखला आहे. याचे जतन करावे. ऍड. ईश्वर घाडी यांनी जीवनात चांगले कर्म हे अंतिम सत्य आहे. अन् तेथेच स्वर्ग आहे. यासाठी धर्माचे रक्षण व भक्तीभाव राखणे गरजेचे आहे, असे विचार मांडले.
सीमाप्रश्न सुटेपर्यंत दिवाळी पाडव्याची आरती न करून घेण्याचा संकल्प
ज्या जळगा गावाने सीमाप्रश्न सुटेपर्यंत दिवाळी पाडव्याची आरती करून घेणार नाही, असा संकल्प केला आहे. या गावाने सीमाप्रश्नाच्या तसेच मराठी भाषेच्या अखेरच्या लढय़ापर्यंत हीच वज्रमुठ राखावी. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालेल्या वारकऱयांनी भगव्या पताका व भक्तीरसाची नाळ जपली आहे. तशीच आपली परंपरा राखण्याचा प्रयत्न येथील वारकरी व गावकऱयांनी करावा, असे आवाहन जि. पं. माजी सदस्य विशाल पाटील यांनी यावेळी केले.
व्यासपीठावरून ऍड. ईश्वर घाडी, उद्योजक केदारी शिवणगेकर, भाजप नेते संजय कुबल, शिवसेनेचे के. पी. पाटील, ‘लैला’चे व्यवस्थापक सदानंद पाटील, नारायण लाड, परशराम लाड आदांनी विचार मांडले. व्यासपीठावर नामदेव शिवणगेकर, कृष्णा कुंभार, ग्रा. पं. उपाध्यक्ष नारायण पाटील, विजय गुरव, सूर्याजी पाटील, शांताराम निखलकर तसेच ग्रा. पं. सदस्य, सदस्या व अनेक नागरिक उपस्थित होते.