वाळवा / वार्ताहर
एका बाजूला प्रचंड महागाई वाढते आहे, स्टील, मसाल्याचे पदार्थ, जीवनावश्यक वस्तू, पदार्थ यांच्या किमती तर सातत्याने वाढत आहेत. परंतु, साखरेचे दर मात्र स्थिर आहेत. साखर उद्योगाला केंद्राने व राज्य शासनाने पॅकेज देण्यापेक्षा साखर उत्पादनावर आधारित साखरेला चांगला दर द्यावा. तरच साखर उद्योग स्पर्धेच्या युगात टिकू शकेल, असे प्रतिपादन हुतात्मा संकुलाचे नेते व हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले, ते हुतात्मा साखर कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगाम सांगता समारंभामध्ये बोलत होते.
सांगता सभा कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली. कार्यकारी संचालक धिरजकुमार माने यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रारंभी पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. वैभव नायकवडी म्हणाले साखरेचे दर मुख्यतः दोन प्रकारे ठरवले पाहिजेत. घरगुती वापरासाठी किंवा खाण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी असे दोन प्रकारचे दर ठरवले तर साखरेला चांगले दर मिळतील आणि शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळेल. लाखो कुटुंबे या साखर उद्योगावर जगत आहेत, त्यांना सुद्धा ऊर्जितावस्था प्राप्त होईल. पेप्सी कोला, कोका कोला असं शीतपेये तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्या तसेच बेकरी पदार्थ, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात व कोट्यावधी रुपये मिळवतात. ऊस उत्पादन शेतकरी मात्र शेतात काबाडकष्ट करून सुद्धा कायम तोट्यात आहे. तो कर्जबाजारी आहे. म्हणून शासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून साखरेला चांगला दर देणे गरजेचे आहे. साखर उद्योगाला कर्जपुरवठा करणाऱ्या आर्थिक संस्था सुद्धा ज्यादा व्याज दराने कर्ज देतात. त्यामुळे कारखान्यांना हा उद्योग चालविणे खूपच जिकिरीचे होत आहे. साखर उद्योग तरला तर सर्वांचे त्यामध्ये भले होणार आहे, लाखो कुटुंबे जगणार आहेत. यंदा राज्यातले अनेक साखर कारखाने चालू झाले नाहीत, काही कारखाने बंद पडले आहेत तर अनेक कारखाने भांडवलदारांना चालवण्यासाठी दिले आहेत. अशी कारखान्यांची भयानक अवस्था झालेली आहे, याचा शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये प्रति क्विंटल ४०० ते ६०० रुपये तोटा सहन करून साखर कारखानदारी चालवलेली आहे. याची दखल साखर कारखान्यांनी घेणे महत्त्वाचे आहे.
सर्वात मोठा रोजगार देणारा साखर उद्योग हा देशातला नंबर २ चा उद्योग आहे. लाखो कुटुंबे या साखर उद्योगावर जगतात. म्हणून सरकारने सकारात्मक पावले टाकत ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे वैभव नायकवडी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.