अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी दिली माहिती : म्हापसा येथे उत्तर गोवा व्हेंडर समितीची बैठक
प्रतिनिधी /म्हापसा
फलोत्पादन महामंडळाच्या गाडय़ांवर निकृष्ट भाजीची विक्री होते, भाज्यां वाढीव दराने विकल्या जातात अशा अनेक तक्रारी सध्या महामंडळाकडे आल्या आहेत. शिवाय आज झालेल्या उत्तर गोवा व्हेंडर समितीच्या बैठकीतही तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. त्यामुळे भाजी विक्री गाडय़ांवर व भाजी घेऊन येणाऱया ट्रकांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. महामंडळाच्या बैठकीत सर्वांनुमते यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी दिली.
म्हापसा येथे श्री देव बोडगेश्वराच्या सभामंडपात आयोजित उत्तर गोव्यातील सर्व व्हेंडरच्या संयुक्त बैठकीत शेट बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई, व्यवस्थापक रघुनाथ जोशी, निरीक्षक विक्रम हळदणकर, निवृत्ती गावस, सुपरवायझर मयुरा फळदेसाई, सुनिल मांद्रेकर, महेंद नाईक, रोशन गावडे, वैभव नाईक, धर्मा मापारी, अभिजित नाईक, पूर्वा कांबळी, संदेश बहीरे, अरविंद भोमकर, दिलीप गावडे, रामनाथ गावडे, कल्पेश परब, सिद्धेश वझे, रामचंद्र पेडणेकर, लक्ष्मीकांत फडते, भार्गव बर्वे, दिलीप मांद्रेकर, साईश पणजीकर, योगेश कोरगावकर आदी उपस्थित होते.
चांगल्या दर्जाची भाजी स्वस्त दरात देण्यास कटीबद्ध
महामंडळाकडे रस्ता निरीक्षक, सुपरवायझर आहेत. त्यांना गोव्यात भाजी घेऊन येणाऱया ट्रकांची पाहणीचा आदेश देण्यात येणार आहे. तसेच त्यांचा समावेश भरारी पथकात करण्यात येईल. त्यांनी कुठेही ट्रक थांबवून पाहणी करुन निकृष्ट भाजी असल्यास कारवाई करण्याचे आदेश त्यांना दिले जातील. बेळगावात जाऊन तपासणी केली आहे. तेथे बैठकीत निकृष्ट दर्जाची भाजी स्वीकारणार नाही असे स्पष्ट सांगितलेले आहे. राज्यातील जनतेला चांगल्या दर्जाची भाजी स्वस्त दरात देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
बंद गाळ्य़ांचा परवाना रद्द करणार
राज्यात एकूण 1250 गाडे धारक आहेत. त्यातील 750 गाडेच सुरु आहेत. काही ठिकाणी जवळ जवळ महामंडळाच्या गाळ्य़ांना परवाने दिले आहेत त्यामुळे ग्राहक येत नाही किंवा ग्राहकांची पंचाईत होते अशा तक्रारी आहेत. त्यावर विचार करुन निर्णय घेण्यात येईल मात्र दूरवर असतानाही गाडा बंद असेल तर कारवाई करण्याचा इशारा प्रेमेंद्र शेट यांनी दिला. तसेच फलोत्पादन महामंडळ गाडय़ांच्या बाजूला काही बिगरगोमंतकीयांनी भाजीची दुकाने थाटली आहेत. त्यांवर पंचायतींनी कारवाई करावी, असे प्रेमेंद्र शेट म्हणाले.