शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या सरी, शेतकऱयांना दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव
दोन दिवसांपूर्वी दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर काहीशी उसंत घेतली होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. अधूनमधून दमदार सरी कोसळत आहेत. याचबरोबर हवेतही गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
शनिवारी सकाळीही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला भिजतच जावे लागले. शनिवार असल्यामुळे बाजारपेठेतही गर्दी होती. मात्र भिजतच खरेदी करावी लागली. या पावसामुळे फेरीवाले, भाजीविपेते यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.
सध्या भात लावणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. बहुसंख्य शेतकऱयांनी भात लावणी केली आहे. या सर्वांना पावसाची नितांत गरज होती. पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील काही शिवारामध्ये पाणी साचून आहे.