नाव, ध्वज जनतेला विश्वासात घेऊन ठरविणार, जम्मू-काश्मीरमध्ये नवी सत्तासमीकरणे शक्य
जम्मू / वृत्तसंस्था
नुकतेच काँगेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नवा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या पक्षाचे नाव आणि ध्वज लोकच ठरविणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. रविवारी जम्मू येथे एका विशाल सभेत त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. काँगेस हा सध्या ट्विटरवर चालणारा पक्ष बनला आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
73 वर्षांच्या आझाद यांनी 50 वर्षांहून अधिक काळ काँगेसची सेवा केल्यानंतर पक्षात्याग करुन जम्मू-काश्मीर प्रदेशात नव्या राजकीय समीकरणांचा प्रारंभ करण्याचे संकेत दिले होते. रविवारी त्यांनी या संकेतांच्या पूर्ततेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत आपल्याला काँगेस पक्षाचा त्याग करावा लागला. काँगेसमध्ये निष्ठावंतपणे सेवा केलेले अनेक नेते आपल्यासह आहेत, याचा त्यांनी त्यांच्या भाषषात आवर्जून उल्लेख करताना काँगेसवर पुन्हा टीका केली.
पूर्ण राज्याचा दर्जा
आपला पक्ष जम्मू-काश्मीर या सध्या केंद्रशासित असलेल्या प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या मूळ रहिवाशांना भूमी आणि रोजगार यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आपला नवा पक्ष कार्यरत राहील, असे ठोस प्रतिपादन त्यांनी भाषणात केले
काँगेसवर चौफेर टीका
काँगेस पक्ष हा आपल्यासारख्या नेत्यांनी कष्ट, घाम आणि रक्ताने बनविला होता. तथापि, आता हा पक्ष रस्त्यावर उतरुन नव्हे, तर संगणक आणि ट्विटरच्या साहाय्याने चालविला जात आहे. कष्ट करणाऱया आणि जनतेशी बांधील असणाऱया नेत्यांना अडगळीत टाकले जात आहे. काँगेसमधील काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे लोक सुमार क्षमतेचे आणि संकुचित मनोवृत्तीचे आहेत. त्यांची मजल केवळ ट्विटर आणि संगणकांपर्यंतच आहे. त्यांना जनमानसाचा ठाव घेता येत नाही, अशी खरपूस टीका त्यांनी केली.
जम्मू-काश्मीरसंबंधी आशावाद
जम्मू-काश्मीर या प्रदेशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. हा प्रदेश सुखी व्हावा, हेच आपले प्रारंभापासून स्वप्न आहे. या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठीच आपण नवा पक्ष स्थापन करीत आहोत. 2005 पासून 2008 पर्यंत आपण या प्रदेशाचे मुख्यमंत्री होतो. तथापि, काही मित्रपक्षांनी मध्येच आपला हात सोडला. त्यामुळे या प्रदेशाच्या उन्नतीसाठी पाहिलेली स्वप्ने आपण पूर्ण करु शकलो नाही. ही खंत आपल्या मनाला सतत डाचत आहे, अशी व्यथही त्यांनी बोलून दाखविली.
राजकारणात अनुभवाला महत्व
आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्री अत्यंत अनुभवी होते. ते सर्व सध्या माझ्याबरोबर आहेत. आम्ही पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरला वैभवी बनविण्याची स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने कामाला लागलो आहोत. जनताही आमच्या सोबत आहे. आम्ही आमची ध्येये गाठण्यात यशस्वी होणार आहोत. मात्र, त्यासाठी कोणतीही घाईगडबड आम्हाला नाही. टप्प्याटप्प्याने आणि दमदार वाटचाल करत आम्ही ध्येयपूर्तीच्या पथावर अग्रेसर होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेला मोठा प्रतिसाद
जम्मूत झालेल्या आझाद यांच्या सभेला लक्षणीय उपस्थित होती, असे दिसून येत आहे. आझाद यांच्या स्वागतासाठी जम्मू विमानतळापासून सभास्थानापर्यंत जाणारा रस्ता माणसांनी फुलून गेला होता. सर्वत्र आझाद यांची पोस्टर्स लावण्यात आली होती. त्यांचे प्रचंड कटआऊटस् आणि होर्डिंग्ज अनेक स्थानी लावण्यात आली होती. सभास्थानी 20 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तथापि, प्रत्यक्षात उपस्थितांची संख्या त्यापेक्षा कितीतरी मोठी असल्याचे दिसले.
काँगेसच्या दुर्दशेवर बोट
भाषणात आझादांचे मुख्य लक्ष्य काँगेस पक्षच होता. 2014 पासून आतापर्यंत देशात एकंदर 49 मोठय़ा निवडणुका झाल्या. त्यांपैकी 39 निवडणुकांमध्ये काँगेसचा दारुण पराभव झाला. नेतृत्वाने पक्षाकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. अनेक राज्यांमध्ये काँगेसचे सामर्थ्य प्रादेशिक पक्षांपेक्षाही कमी झाले आहे. या पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला.