शेतकऱयांना होणार लाभ, गहू आणि इतर धान्यांचा समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रबी पिकांच्या आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खरीप हंगाम संपण्याच्या बेतात असताना पुढच्या हंगामातील पिकांसाठी दर घोषित करण्यात आले आहेत. या पिकांमध्ये गव्हासह इतर धान्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही घोषणा मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारकडून शेतकऱयांना ही दिवाळीची भेट समजण्यात येत आहे.
ज्या पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे, त्यांच्यात गहू. नाचणी, चणा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल यांचा समावेश आहे. गव्हाच्या किमान आधारभूत दरात 110 रुपये प्रतिक्विंटल अशी वाढ करण्यात येऊन तो 2,125 रुपये करण्यात आला आहे. कृषी गुंतवणूक आणि मूल्य निर्धारण आयोगाने या पिकांच्या दरात 3 टक्के ते 9 टक्के वाढ करण्याची सूचना आपल्या अहवालातून केली होती. त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे.
मसूराच्या किमान आधारभूत दरात प्रति क्विंटल 500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोहरी आणि कॅनोलाच्या किमान आधारभूत दरात प्रतिक्विंटल प्रत्येकी 400 रुपये वाढ करण्यात आली आहे. नाचणीच्या दरात प्रतिक्विंटल 100 रुपये, चणा दरात प्रतिक्विंटल 105 रुपये आणि सूर्यफूल दरात प्रतिक्विंटल 209 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ?
किमान आधारभूत दर याचा अर्थ शेतकऱयांकडून कृषी उत्पादने विकत घेताना द्यावा लागणारा किमान दर असा आहे. प्रत्यक्षात बाजारात यापेक्षा कमी दरात हा माल विकला गेला तरी शेतकऱयाला व्यापाऱयांकडून किमान आधारभूत दर मिळालाच पाहिजे असा नियम आहे. सरकार ज्या पिकांची खरेदी शेतकऱयांकडून करते, त्या पिकांना सरकारलाही किमान आधारभूत दरच द्यावा लागतो.
दर पुढीलप्रमाणे वाढविण्यात आले आहेत
- पिकाचे नाव आधारभूत दर पुढच्या हंगामाचे दर वाढ
- गहू 2,015 रुपये 2,125 रुपये 110 रु.
- नाचणी 1,635 रुपये 1,735 रुपये 100 रु.
- चणा 5,230 रुपये 5,335 रुपये 105 रु.
- मसूर 5,500 रुपये 6,000 रुपये 500 रु.
- मोहरी 5,050 रुपये 5,450 रुपये 400 रु.
- सूर्यफूल 5,441 रुपये 5.650 रुपये 209 रु.