ऑनबाईन टीम/तरुण भारत
वेदांता-फॉक्सकॉननंतर (Vedant-Foxconn) महाराष्ट्रात (Maharashtra) होणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला (Gujarat) गेला आहे. भारतीय हवाई दलासाठी (Indian Air Force) C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसवर (tata airbus) सोपवण्यात आली आहे. हा प्रकल्प नागपूरला (Nagpur) होणार होता. पण आता हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. कंपनी या विमानांची निर्मिती आता वडोदरा (Vadodara) येथील प्लांटमध्ये करणार आहे. याबाबत लष्कराच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. पहिली 16 विमाने 2023 ते 2025 दरम्यान येतील. तसेच हे पूर्णपणे स्वदेशी असून, 2026 ते 2031 या काळात भारतात बनवलेल्या विमानांचा पुरवठा केला जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, C-295 वाहतूक विमान (एअरबस) या प्रकल्पावरून नवीन वादाला सुरूवात झाली आहे.
‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रात सुरू व्हावा, यासाठी आधी महाविकास आघाडी आणि नंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न केले होते. परंतु, हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा या कंपनीने केली. त्यावेळी ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी महाराष्ट्राला तेवढाच मोठा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. एअरबस आणि टाटा यांचा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी यांनी हा प्रकल्प राज्यात उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, हा प्रकल्पही गुजरातला गेल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. यांनतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.
काही दिवसापूर्वी उदय सामंत यांनी, C-295 प्रकल्प नागपूरला सुरू होणार असल्याचे म्हटले होते. याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्आयांनी सांगितले होते. पण आता हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी वडोदऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचं उद्धाटन करणार आहेत.
हा प्रकल्प भारतीय खाजगी क्षेत्राला तंत्रज्ञान सघन आणि अत्यंत स्पर्धात्मक विमान वाहतूक उद्योगात प्रवेश करण्याची अनोखी संधी देतो. यामुळे देशांतर्गत विमान वाहतूक उत्पादन वाढेल ज्यामुळे आयात अवलंबित्व कमी होईल आणि निर्यातीत अपेक्षित वाढ होईल,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.