मागच्या निवडणुकीपेक्षा मतदान कमी, निवडणूक आयोगाचे अधिक मतदानाचे आवाहन
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात शहरी भागांमध्ये मतदारांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून आला आहे. त्यामुळे मतदानात घट झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार प्रथम टप्प्यात एकंदर 63.14 टक्के मतदान झाले असून ते 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील याच मतदारसंघांपेक्षा 3.61 टक्क्यांनी कमी आहे.
सुरत, राजकोट आणि जामनगर या शहरांमध्ये प्रथम टप्प्यातील सरासरीपेक्षाही कमी मतदान झाले आहे. कच्छ भागातील गांधीधाम मतदारसंघात सर्वात कमी, अर्थात 47.86 टक्के मतदान झाले. ते गेल्यावेळेपक्षा 6.34 टक्क्यांनी कमी आहे. सुरत जिल्हय़ातील कारंज मतदारसंघात 50.54 टक्के मतदान झाले असून ते गेल्यावेळेपक्षा 5.37 टक्के कमी आहे. ग्रामीण भागांमध्ये मात्र मोठय़ा प्रमाणात मतदान झाले. मात्र तेही गेल्यावेळेपेक्षा कमीच असल्याचे दिसून येते.
मोठे अंतर
गांधीधाम या शहरी मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. तर नर्मदा जिल्हय़ाच्या देदियापाडा मतदारसंघात सर्वाधिक 82.71 टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही मतदारांमधील अंतर 34.85 टक्क्यांचे आहे. यावरुन शहरी भागातील निरुत्साहावर प्रकाश पडतो. मिश्र मतदारसंघांच्या शहरी भागांमध्ये मतदान कमी झाले आहे, तर ग्रामीण भागांमध्ये अधिक मतदान झाल्याचे दिसून येते. ज्या 26 मतदारसंघांमध्ये 65 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे, ते सर्व ग्रामीण भागांमधील आहेत. शहरी भागातील एकाही मतदारसंघात 65 टक्क्यांपर्यंतही मतदान झालेले नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
दुसऱया टप्प्यासाठी आवाहन
दुसऱया टप्प्यात मतदारांनी मोठय़ा संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. गेल्यावेळीही या दुसऱया टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रथम टप्प्यातील मतदारसंघांपेक्षा अधिक मतदान झाले होते. यावेळी ते त्याहीपेक्षा जास्त व्हावे, अशी इच्छा आयोग अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.