शेकोटी साहित्य संमेलनाची सांगता : केंद्र सरकारशी पत्रव्यवहाराचा ठराव
वार्ताहर /सावईवेरे
म्हादई ही गोमंतकाची जीवनदायिनी आहे. तिचा गळा घोटला गेल्यास येथील शेती बागायती व कुळागरांबरोबरच साहित्य व संस्कृतीवरही दूरगामी परिणाम होणार आहे. म्हादई वाचविण्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्याचा ठराव कोकण मराठी परिषदेच्या सतराव्या शेकोटी साहित्य संमेलनात घेण्यात आला. केरी-फोंडा येथील श्री विजयादुर्गा मंदिरच्या सभामंडपात भरलेल्या या संमेनलाचा रविवारी समारोप झाला. कोमपचे सल्लागार अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी समारोप सोहळय़ात मांडलेला म्हादई संबंधीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
समारोप सोहळय़ाला व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रख्यात साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, विजयादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष संतोष देसाई, कोमपचे अध्यक्ष सागर जावडेकर, कार्यवाह चित्रा क्षिरसागर, कोषाध्यक्ष अजित नार्वेकर, सत्कारमूर्ती ज्येष्ठ शिक्षिका स्वप्ना धूपकर व जयराम रेडकर हे उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात ऍड. रमाकांत खलप म्हणाले, कोकण मराठी परिषदेच्या साहित्यक उपक्रमाला कधीही राजकारणाचा स्पर्ष झालेला नसून सर्वांनी एकत्रितपणे संमेलनाची धुरा पुढे नेली आहे. गोमंतक साहित्य सेवक मंडळ ही संस्था शतकाकडे वाटचाल करीत आहे. मराठीची सेवा करणाऱया गोव्यातील सर्व संस्थाना एकाच छताखाली आणण्याची सूचना त्यांनी यावेळी मांडली. मराठी भाषा व भाषाप्रेमी यांच्या संबंधी चुकीचे समज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. गोमंतकीय सुपुत्र व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना 80 व्या वाढदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच म्हादई बचाव संबंधीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. सतराव्या शेकोटी साहित्य संमेलनातील माहिती संकलीत करुन आगामी संमेलनात ती ग्रंथस्वरुपात प्रसिद्ध करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
धुपकर, रेडकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ शिक्षिका स्वप्ना धूपकर व जयराम रेडकर यांना लक्ष्मीकांत देशमुख यांच्याहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रा क्षिरसागर यांनी स्वप्ना धूपकर यांची तर सागर जावडेकर यांनी जयराम रेडकर यांच्या कार्याची ओळख करुन दिली. दोन्ही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात लक्ष्मीकांत देशमुख यांनी दोन दिवशीय संमेलनाचा आढावा घेतला. साहित्यिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक स्पर्ष असलेल्या या संमेलनात गोव्यातील साहित्यिक कलावंतांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सादर केलेले कार्यक्रम अप्रतिम होते. कल्पकता, वक्त्यांची निवड, विषयांची खोली या सर्व बाजू अभिनव अशा होत्या. युवा सृजन कलारंग कार्यक्रम पाहताना गोव्यात लता मंगेशकर व जितेंद्र अभिषेकींसारखे कलाकार निर्माण होतील यात शंका नाही, असे त्यांनी नमूद केले. ‘मिळून साऱयाजणी माझीया अंगणात’ हा कार्यक्रम स्त्रीवेदना व स्त्रीमन जाणण्यासाठी उपयुक्त ठरला. गोरख मांदेकर, नितेश केरकर व राजेंद्र देसाई यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रा. नारायण महाले यांनी सूत्रसंचालन तर सागर जावडेकर यांनी आभार मानले.