गावांमध्ये पूर्णपणे लाकडाने निर्मित घरं, भूकंपाच्या दृष्टीकोनातून सर्वात सुरक्षित
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये अनेक घरे तसेच इमारतींना मोठय़ा भेगा पडल्या आहेत. सरकारने या इमारती पाडविण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वतीय राज्यांमध्ये अशाप्रकारची घटना सामान्य मानली जाते. परंतु याच पर्वतीय राज्यात अशी गावे देखील आहेत, जेथील स्थापत्यकला अत्यंत विशेष असून पर्यावरणाच्या दृष्टीकोनातूनही सर्वात सुरक्षित मानली जाते. या स्थापत्यकलेला ‘कोटी बनाल’ म्हटले जाते.
पूर्णपणे देवदार वृक्षाच्या लाकडाद्वारे निर्मित या घरांना केवळ आगीपासून धोका असतो. वैज्ञानिक देखील या घरांना भूकंपाच्या दृष्टीकोनातून सर्वात सुरक्षित मानतात. या गावांमध्ये सिगारेट-विडी ओढण्यावर बंदी आहे. सर्व घर लाकडांनी तयार केली असल्याने यात आग लागण्याचा धोका असतो, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही गावे धूम्रपानापासून पूर्णपणे दूर आहेत.
हजारो वर्षे जुनी स्थापत्यकला
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्हय़ातील रवाई क्षेत्रात गंगाड तसेच ओसला यासारख्या 5 गावांमध्ये अशाचप्रकारची घरे दिसतात. तीन ते चार मजली घरे देखील देवदार वृक्षाच्या लाकडाद्वारे तयार केली जातात. ही स्थापत्यकला हजारो वर्षे जुनी आहे. येथील घरांचा तळमजला हा पशूंसाठी असतो, तर सर्वात वरच्या मजल्यात बकऱयांना ठेवले जाते. तर मधल्या मजल्यावर लोक राहतात. त्यावरील मजल्यावर धान्याचा साठा केला जातो.
1991 च्या भूकंपातही सुरक्षित
येथील घरं ही स्थापत्यकला तसेच विज्ञानाच्या दृष्टीकोनातून अत्यंत अनोखी आहेत. उत्तराखंडमध्ये 1991 च्या विध्वंसक भूकंपात मोठे नुकसान झाले होते, परंतु या घरांना कुठलाच धक्का पोहोचला नव्हता. राजगढी, मोरी बडकोट, पुरोला आणि टकनोर क्षेत्रांमध्ये अशाचप्रकारची घरे तयार केली जातात. देवदार वृक्षाचे लाकूड सुमारे 900 वर्षांपर्यंत हवामानातील बदल सहन करू शकते असे मानले जाते. याचमुळे ही घरे भूकंपरोधक असण्यासह हवामानाप्रकरणीही सुरक्षित असतात.