पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ः गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महामेळा
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. याप्रसंगी त्यांनी उपस्थित कंपन्या आणि समुदायांना गुंतवणूक वाढविण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. आज सरकार पायाभूत सुविधांवर विक्रमी खर्च करत असून आम्ही दरवषी त्यात वाढ करत आहोत, त्यामुळे तुमच्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. आरोग्य आणि शिक्षणातही गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या कार्यक्रमस्थळी पोहोचले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचीही याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 मध्ये देखील हजेरी लावली.
उत्तर प्रदेशचा नावलौकिक बदलत असल्याबाबत पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जोर दिला. लवकरच उत्तर प्रदेश हे 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील एकमेव राज्य म्हणून ओळखले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच डेडिकेटेड प्रंट कॉरिडॉरद्वारे उत्तर प्रदेश आता थेट गुजरातशी जोडले जाईल. आज उत्तर प्रदेशची ओळख चांगली कायदा आणि सुव्यवस्था, शांतता आणि स्थिरता आहे. उत्तर प्रदेशच्या पायाभूत सुविधांच्या उपक्रमांचे परिणाम दिसून येत आहेत, असे ते म्हणाले.
भारताच्या समृद्धीमध्ये जगाची समृद्धी आहे. उत्तर प्रदेशची भूमी सांस्कृतिक वैभव, गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारसा यासाठी ओळखली जाते. एवढी क्षमता असूनही पूर्वीच्या सरकारांना राज्याचा विकास करता आला नाही. येथील कायदा व सुव्यवस्था सुधारणे अशक्मय असल्याचे लोक म्हणायचे. उत्तर प्रदेशला ‘बिमारू राज्य’ असे म्हटले जायचे. येथे हजारो कोटींचे घोटाळे व्हायचे. पण मागील अवघ्या 5-6 वर्षात यूपीने स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली आहे. आता यूपीची ओळख सुशासनाने होत असल्याचे पंतप्रधानांनी याप्रसंगी ठासून सांगितले.
गुंतवणुकदारांची राज्याला पसंती
उत्तर प्रदेशच्या इतिहासातील आजचा दिवस मोठा आहे. उत्तर प्रदेश हे 6 वर्षांत गुंतवणुकीचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. आज 27 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले जात आहेत, जे उत्तर प्रदेशच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरतील, असे राज्यमंत्री जितिन प्रसाद म्हणाले. तर, आता लोक सुरक्षेच्या दृष्टीने उत्तर प्रदेशला सर्वोत्तम मानतात. चांगल्या कामाच्या जोरावर योगी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लोकांचा आत्मविश्वास वाढला. आज अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे या समिटमधील उपस्थितीवरून दिसून येत असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना म्हणाले.
‘न्यू उत्तर प्रदेश’मध्ये हार्दिक स्वागत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये समिटला ‘समृद्धीच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात’ असे म्हटले आहे. ही तीन दिवसीय शिखर परिषद राज्यासह देशाच्या विकासाला नवी दिशा देणार असल्याचे बोलले जात आहे. यातून लाखो कोटींची गुंतवणूक उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज संपूर्ण जगाला राज्याच्या विकासाची गाथा पाहायला मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या समिटच्या माध्यमातून राज्यात विकासाच्या अपार संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्था सुधारल्यामुळे राज्यात गुंतवणूकदारांची आवड वाढल्याचा योगी सरकारचा दावा आहे. राज्याला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी देश-विदेशातील अनेक मोठय़ा शहरांना भेटी देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.