मंडल निरीक्षक हल्लाप्रकरण : ती कार पोईप मंडल निरीक्षकाची : महसूल प्रशासनाकडून अद्याप खुलासा नाही
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
अतिसंवेदनशील बनलेल्या वाळूच्या मुद्यावरून तिघा मंडल निरीक्षकांना झालेल्या बेदम मारहाणचीचे पडसाद सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलीस यंत्रणेनेदेखील या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, या घटनेची बातमी ‘तरुण भारत’ने पुराव्यांसह प्रसिद्ध करताच महसूल यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. कोणत्याही परिस्थितीत प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, अधिकाऱयावर हल्ला होऊनही पोलिसांत नोंद नसल्याने मारझोड झालेल्या त्या तिघा अधिकाऱयांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीत. मात्र, तरीदेखील हल्लेखोरांकडून मोडतोड झालेली व ते तिन्ही अधिकारी ज्या कारमध्ये बसून घटनास्थळी गेले होते ती कार पोईपचे मंडल निरीक्षक रतन शिंगाडे यांची असल्याचे उघड झाले आहे. आर. टी. ओ. कार्यालयातून याची खातरजमा झालेली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोईपच्या या मंडल निरीक्षकाचा सहभाग असल्याचे पुढे येत आहे. अन्य अधिकाऱयांची नावेदेखील चौकशीत बाहेर येणार आहेत.
शुक्रवार 6 मार्चच्या मध्यरात्री धामापूरच्या पठारावर या तिघा मंडल निरीक्षकांना बेदम मारहाण झाली. हा जीवघेणा हल्ला करणाऱया हल्लेखोरांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु मुळात हे मंडल निरीक्षक कोण होते? खासगी वाहने घेऊन ते तिघे त्या ठिकाणी का व कशासाठी गेले होते? ते ऑनडय़ुटी होते का? होते तर ते खासगी वाहन घेऊन नेमकी कोणती डय़ुटी करत होते? रात्री पेट्रोलिंग करा, असे त्यांना अधिकृत आदेश होते का? होते तर तसे आदेश त्यांना कोणी दिले, याची तातडीने चौकशी होऊन त्याबाबतची माहिती महसूल प्रशासनाने जनतेसमोर ठेवली पाहिजे.
कारच्या मोडतोडीबाबत लपवाछपवी का?
मारहाण झालेले ते मंडल निरीक्षक आपली खासगी गाडी घेऊन ऑनडय़ुटी होते तर कारला झालेल्या हानीची त्यांनी पोलीस खाते व आपल्या खात्याकडे का खबर दिली नाही? अपघातामुळे कारची मोडतोड झाली, असे त्यांचे म्हणणे असेल तर या अपघाताची खबर त्यांनी का दिली नाही? त्यांनी याबाबत लपवाछपवी का केली? एवढी मारहाण होऊनही त्यांनी या हल्ल्याची आपल्या वरिष्ठांना का खबर दिली नाही? त्यानी ही मारहाण व कारची झालेली हानी मुकाटपणे सहन का केली, याची चौकशी होऊन महसूल प्रशासनाने खुलासा करायलाच हवा. यातील दोषींवर कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
हल्लेखोरांवरही कारवाई हवीच!
सरकारी अधिकाऱयांवर असा थेट आणि जीवघेणा हल्ला होणेदेखील या जिल्हय़ाला मुळीच शोभणारे नाही. यालाच ‘माफिया राज’ म्हणतात. आज हे अधिकारीच तसे होते. पैसे घेऊनही ते छळायचे म्हणून त्यांना मारहाण झाली, असा काहींचा दावा असला तरी एकदा या हल्लेखोरांना पाठिशी घातले तर उद्या हे हल्लेखोर प्रामाणिक अधिकाऱयांवर हात टाकू शकतात. उघडपणे गावात दहशत निर्माण करू शकतात. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणे तेवढेच गरजेचे आहे. मात्र, चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे प्रकार आता महसूल प्रशासनाने बंद केले पाहिजेत. या संपूर्ण प्रकरणातील सत्य जनतेसमोर यायला हवे.