ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाची सोप्या भाषेत माहिती, घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करु नये, याबाबत राज्यात स्थलांतरित करण्यात आलेल्या 47 हजार मजुरांना माहिती देण्यात येत आहे. राज्यातील समुपदेशक, मनोविकार तज्ञ आणि मनोविकार परिचारिका यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. या समुपदेशनाचा विधायक परिणाम मजूर वर्गामध्ये दिसत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
समुपदेशनादरम्यान, ज्या मजुरांना मध्यम ते गंभीर स्वरुपाचे मनोविकार आहेत. त्यांना भरती करुन योग्य ते उपचार देखील देण्यात येत आहेत. राज्यात सध्या सुमारे आठ हजाराच्या आसपास लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिथे जाऊन त्यांनाही समुपदेशन करणं, त्यांच्या अडचणी समजवून घेण्याचे काम केले जात आहे. राज्यात सध्या 30 समुपदेशक, 28 मनोविकार तज्ज्ञ, 36 मनोविकार नर्स यांच्या माध्यमातून हे काम केले जात आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 47 हजार स्थलांतरित मजुरांचे समुपदेशन
लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात अडकलेल्या 47 हजार मजुरांचे आरोग्य विभागाच्या वतीने मानसिक समुपदेशन करण्यात आले आहे. असंघटित क्षेत्रातील मजूर 944 निवारागृहांमध्ये राहत आहेत. त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. याच जोडीला त्यांना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे मानसिक समुपदेशन करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत राज्यभर सुरू आहे.
स्थलांतरित मजुरांची राहण्याची आणि जेवणाची सोय राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. घरापासून दूर राहणे, आर्थिक कुचंबणा, कोरोना आजाराची सुप्त भिती यामुळे या मजूरांना अनेक मानसिक व्याधींना तोंड द्यावे लागते. यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे या स्थलांतरित मजुरांना समुपदेशन देण्याचे काम राज्यात सुरु आहे.