भाजप सरचिटणीस दामू नाईक
प्रतिनिधी / मडगाव
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात दहावीची परीक्षा ही एक महत्वाचा टप्पा असतो. या परीक्षेवरच विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरलेले असते. पण, दहावीच्या परीक्षेला ‘कोविड-19’ कारण पुढे करून विरोध करणे हा प्रकार योग्य नव्हता. विरोधकांनी विरोधासाठी विरोध न करता, काही वेळा सकारात्मक भूमिका घेणे महत्वाचे असते असे भाजपचे राज्य सरचिटणीस दामू नाईक म्हणाले.
मडगावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, मंडळाचे सचिव नवीन पै रायकर व नगरसेवक केतन कुडतरकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दामू नाईक म्हणाले की, दहावीची परीक्षा सुरळीत होईल याची पूर्ण जबाबदारी सरकारने घेतली असून ज्या वर्गात विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. त्या वर्गाचे सेनिटायंझेशन करण्यात आले आहे. सद्या गर्मीचे दिवस असल्याने वर्गात पुरेशी पंख्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवले जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच वैद्यकीय कर्मचारी प्रत्येक परीक्षा केंद्रावर तैनात केले जातील.
मुलांनी कोणताच तणाव किंवा दबावाखाली न येता, परीक्षेला सामोरे जावे असे श्री. नाईक म्हणाले. मुंबइं उच्च न्यायालयाने काल बुधवारी जो निर्णय दिला आहे. त्याचे समर्थन करतानाच त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच भाजप सरकारने ज्या उपाय योजना आखल्या त्याबद्दल सरकारचे व खास करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहे.
दहावीच्या परीक्षेला विरोध न करता, विरोधकांनी सकारात्मक भूमिका ठेवावी. आज पासून परीक्षा सुरू होत आहे. ती व्यवस्थित होण्यासाठी सर्वानी सरकारला मदत करावी. ज्यात असंख्य विद्यार्थ्याचे हित गुंतलेले आहेत. ज्यांची भावी वाटचाल याच परीक्षेवर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर दहावीच्या परीक्षेसाठी मेहनत घेतली आहे. त्यांच्या पालकांनी कष्ट उपसले आहेत. त्याचे हित जपणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.