वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसारही देशात झपाटय़ाने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता देशात 17 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे ब्रिटन आणि स्पेनपेक्षाही भारतातील रुग्णसंख्या अधिक झाली आहे. हा वेग असाच राहिल्यास 30 ऑगस्टपर्यंत जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या भारतात होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
दिवसात 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले
देशात प्रथमच एका दिवसात दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गत 24 तासात 10 हजार 956 नवे रुग्ण आढळले. तर कोरोनामुळे 396 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या दोन लाख 97 हजार 535 झाली आहे. यातील 1 लाख 47 हजार 195 जण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 1 लाख 41 हजार 842 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन
कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शिक्षण क्षेत्र पुन्हा सुरळीत होण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने केलेल्या सूचनेनुसार दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाईल, अशी माहिती ‘युजीसी’ अध्यक्ष प्रा. डी. पी. सिंह यांनी सांगितले.
रोजगार मंत्रालयातील 25 कर्मचारी पॉझिटिव्ह
रोजगार मंत्रालयातील 25 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. या मंत्रालयातील 36 कर्मचाऱयांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संपूर्ण मंत्रालय परिसराचे निर्जुंतकीकरण करण्यात आले आहे.
श्रमिक विशेष एक्सप्रेसची मागणी घटली
परराज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी श्रमिक विशेष
एक्सप्रेसची सुविधा पुरविण्यात आली होती. गरजेनुसार राज्यांकडून याबाबतची मागणी होत आहे. मात्र गत काही दिवसात या मागणीत घट झाली होती. आता सर्व राज्यांनी 63 एक्सप्रेस सोडण्याची मागणी केली आहे. यामध्ये 32 केरळसाठी तर 23 पश्चिम बंगालला सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
जुलै, ऑगस्टमध्ये सर्वाधिक रुग्ण
देशात जुलै महिन्याच्या मध्य आणि ऑगस्टमध्ये कोरोना विषाणू संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण असतील. पुढील वर्षापर्यंत तरी कोरोनावर ठोस औषध किंवा लस तयार होईल, असे वाटत नाही, असे दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ. एस. पी. ब्योत्रा यांनी सांगितले आहे.
दिल्लीत लॉकडाऊन वाढणार नाही
दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन केले जाईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र लॉकडाऊन वाढविण्याचा राज्य सरकारचा विचार नाही, असे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. दरम्यान, यासंदर्भात दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. दरम्यान, दिल्लीतील जामा मशीद 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मशिदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी शुक्रवारी दिली.