हायवे चौपदरीकरण : भरावावर शेडची उभारणी : हायवे अधिकारी-लोकप्रतिनिधींचा वचक नाही
वार्ताहर / कुडाळ:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बसथांब्यावर प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे काम दर्जाहिन केले आहे. या काही शेडच्या स्लॅबला गळती लागली आहे, तर आतील फरशांचे कामही निकृष्ट करण्यात आले. भरावावरच या शेड उभारल्या असून पायाही तकलादू आहे. प्रवाशांसाठी या शेड असुरक्षित आहेत. हायवे अधिकारी व लोकप्रतिनिधींचा संबंधित ठेकेदार कंपनीवर वचक नसल्याने हा अनागोंदी कारभार सुरू आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना पावसाळय़ात काही ठिकाणी महामार्ग खचणे, भातशेतीत भराव वाहून जाणे, नियोजनशून्य कामामुळे महामार्गालगतच्या भातशेतीमध्ये पाणी शिरून नुकसान होणे, अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ठेकेदार महामार्गाचे काम घाईगडबडीत उरकून घेत आहे. या निकृष्ट कामाचा प्रताप सध्या पहायला मिळत आहे.
महामार्गावरील बसथांब्यावर बांधण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेडच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. चौपदरीकरणासाठी भराव टाकण्यात आला. त्यालगतच भराव टाकून शेड बांधण्यात आल्या. शेडचा पाया मजबूत न करता त्या भरावावर त्याचे बांधकाम करण्यात आले. या कामाचा दर्जाही योग्य नाही. शेडला प्लास्टर करण्यात आले असून भरावापासून पायाचा भाग प्लास्टरविना ठेवण्यात आला आहे. हा भराव खचून शेडला धोका पोहोचू शकतो.
भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय?
साळगाव-जांभरमळा, बिबवणे व अन्य काही ठिकाणच्या शेडचे स्लॅब गळत आहेत. स्लॅबच्या दर्शनी भागाला कौलांचे आच्छादन करण्यात आले, तर मागील भागाला कौले बसविण्यात आली नाहीत. आतील फरशाही उखडल्या आहेत. अजून या शेड वापरात नसून सुरुवातीलाच ही अवस्था असेल, तर भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय?, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
कामावर अधिकाऱयांची देखरेख नाही
लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास समस्या आणली, तर ते फक्त हायवे अधिकारी व ठेकेदार कंपनीला सूचना करतात. पण प्रत्यक्षात साधी दखल घेतली जात नाही. चौपदरीकरणाच्या कामावर अधिकारी देखरेख करीत नाहीत, म्हणूनच ठेकेदार मनमानी काम करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
..अन्यथा आंदोलन करावे लागेल!
चौपदरीकरणामुळे अनेक समस्या पुढे येत आहेत. त्यामुळे हायवे ठेकेदार कंपनीने भ्रष्ट कारभार केल्याचे स्पष्ट होत आहे. या निवारा शेडचेही बेजबाबदार काम केले आहे. भरावावर या शेड उभारताना योग्य दर्जा राखला नाही. बांधकामात मजबुतीपणा नाही. या निकृष्ट कामाची ठेकेदार कंपनीने तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष भास्कर परब यांनी दिला आहे.