गत तीन वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी घटले प्रमाण
सातारा / गौरी आवळे
देशासह जिह्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सूरू आहे. यांचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. मात्र, गत तीन वर्षीच्या तुलनेत या लॉकडाऊनमध्ये बालविवाहाचे प्रमाण घटले आहे. चालू वर्षी जून महिन्यात एक बालविवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश आले. अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी तरूण भारतशी बोलताना दिली.
बालविवाह होऊ नयेत म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप त्याला पूर्णपणे रोखण्यात यश आले नसल्याचे चित्र आहे. जिह्यात कोरोनामुळे मार्च ते मे अखेर सर्वत्र संचारबंदी लागू होती. या दरम्यान वेगवेगळया पद्धतीने विवाह झाले आहेत. त्यातच जून महिन्यात बालविवाह होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिह्यातील फलटण तालुक्यात 16 वर्षाच्या मुलींचे लग्न ठवण्यात आले होते. मुलीला 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच तीचे लग्न लावले जात असल्याची माहिती पत्राद्वारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना देण्यात आली. या महितीवरून ताबडतोब कारवाई करीत हा बालविवाह रोखण्यात आला. मुलींच्या पालकांना समज देत आम्ही आमच्या मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तीचा विवाह करणार नाही. असे लेखी स्वरूपात लिहून घेतले.
तालुकापातळीवर कार्यरत असणारे संरक्षण अधिकारी, चाईल्ड लाईन, ग्रामपंचायत यंत्रणा, अंगणवाडी यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांची सक्षम बांधणी केल्यामुळे जिह्यात गत तीन वर्षात 13 बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे. सर्वत्र कोरोना व्हायरसचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना सामाजिक, मानसिक, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बाल विवाहाच्या कुटुंबाचे समुपदेशन करून पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, मुलींच्या आरोग्य विषयक समस्या, बाल विवाहाचे होणारे गंभीर यांची जाणीव करून देण्यात येते. समुपदेशनातून पालकांचे मत परिवर्तन करून बाल विवाह थांबविण्यात यश मिळते.
बालविवाह रोखल्याचे आकडेवारी
2017-18- 4
2018-19- 4
2019-20- 5