वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) 3 सप्टेंबर रोजी रालोआत सामील होणार आहे. मांझी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत संजदसोबत आघाडी केल्याची घोषणा केली आहे. संजदसोबत आघाडी असल्याने हम आता रालोआचा सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बिहार निवडणुकीपूर्वी महाआघाडीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
नितीश कुमार यांच्या संजदचा हिस्सा होऊन त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या जाळय़ात अडकल्यानेच रालोआतून बाहेर पडलो होतो असा दावा मांझी यांनी केला आहे.
मतपेढीचे राजकारण
बिहारमध्ये दलित आणि महादलितांची मते सुमारे 16 टक्के इतकी आहे. यातील सुमारे 5 टक्के मते रामविलास पासवान यांच्या पक्षासोबत असल्याचा दावा केला जातो. तर मांझी यांच्यामागे 5.5 टक्के असलेला मुसहर समुदाय असल्याचे मानले जाते. मागील दोन निवडणुकांमध्ये सुमारे 2 ते 2.5 टक्के मते मांझी यांच्या नावावरच मिळत असल्याचे दिसून आले आहे.