दिव्यंगत्वावर मात करीत 44 व्या वर्षी 12 वी उत्तीर्ण
गरीबीमुळे सोडले होते शिक्षण अर्धवट
वैभववाडी / उज्वल नारकर:
शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. प्रबळ इच्छा शक्ती असेल तर कोणत्याही वयात शिक्षणाचे इमले चढवता येतात. त्यातून ज्ञान मिळविता येते. नर्ले- तिरवडे येथील बबन तातोबा पवार यांनी आपल्या दिव्यंगत्वावर मात करीत वयाच्या 44 व्या वर्षी 12 वी परीक्षा उत्तीर्ण होऊन उंच भरारी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पवार आपल्या गावच्या ग्रामपंचायतीत डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात. ते जन्मतःच एका पायाने अपंग आहेत. मात्र, दिव्यंगत्वावर मात करीत त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांनी 1994 मध्ये 12 वीची परीक्षा दिली होती. मात्र, नशिबाने त्यांना साथ दिली नाही. यावेळी ते इंग्रजी विषयात अपयशी ठरले. घरची परिस्थितीही हलाखीची असल्याने शिक्षण अर्धवट सोडून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन शोधावे लागले. त्यामुळे शिक्षण अर्धवटच राहिले. त्यानंतर गेल्या गेल्या 25 वर्षात त्यांनी पुढील शिक्षणाचा विचारही केला नाही. त्यामुळे 12 वी नापास हा शिक्का त्यांना लागला होता.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात उच्च शिक्षण घेणाऱयांची संख्या ही अफाट आहे. जिथे उच्च शिक्षण घेणाऱयांची अवस्था बिकट आहे, तिथे आपल्या 12 वी नापास शिक्षणाला काय किंमत असेल असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला. त्यातून त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
स्वतः अपंग आहोत, ही मानसिकता त्यांनी बदलून टाकली. या अपंगाला चिकटून न राहता, त्याचा बहू न करता उंच भरारी घेण्याची महत्वाकांक्षा त्यांनी मनाशी बाळगली. ती पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घेण्याची तयारी दर्शविली.
शिक्षणाशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही आणि त्याला वयाची मर्यादा रोखू शकणार नाही. हा निश्चय करून जिद्दीने 12 वी उत्तीर्ण होण्याचा संकल्प केला. त्यात त्यांना यश ही आलं. त्याची ही जिद्द आणि जीवनप्रवास धडधाकट माणसांदेखील प्रेरणादायी ठरेल असाच आहे.
शिक्षण, वाचन यातून मिळणारे ज्ञान कुठेही वाया जाणार नाही. जगात अशी एकच गोष्ट आहे जी कोणी चोरू शकत नाही किंवा ओरबोडून नेऊ शकत नाही ती म्हणजे ज्ञान..! म्हणून पवार यांनी या वर्षी वयाच्या 44 व्या वर्षी इंग्रजी विषयाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यात ते चांगल्या मार्कने उत्तीर्णही झाले.
पवार यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. पण, त्यांनी कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करता परिस्थितीशी दोन हात करीत पुढे वाटचाल करीत राहिले. कुठलीही व्यक्ती शरीराने अपंग नसते. तर मानसिकतेने अपंग असते. प्रगल्भ इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही. हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.