ढवळीकरांच्या टिकेला दळवींचे प्रत्युत्तर
प्रतिनिधी / फोंडा
सर्वांना सामावून घेत राजकारणात पुढे जाण्याची संधी देण्याच्या भाजपाच्या कार्यपद्धतीमुळेच मगोच्या नगरसेवकांनी स्वेच्छेने भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यांना कुणी पळवून आणलेले नाही. उलट मगो पक्षातील घराणेशाहीमुळे या पक्षात लोक टिकत नाहीत. अधोगती भाजपाची नव्हे तर मगो पक्षाचीच सुरु झाली आहे. त्यामुळेच वैफल्यग्रस्त झालेले मगो नेते सुदिन ढवळीकर भाजपावर उलटसुलट आरोप करीत असल्याची टीका फोंडय़ाचे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी केली आहे.
फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक शांताराम कोलवेकर हे उपस्थित होते. ज्या दोघा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला ते यापूर्वी भाजपामध्येच होते व ते मगो पक्षामुळे नव्हे तर आपल्या कतृत्त्वावर निवडून आलेले आहेत, असे सांगून मगोमधील अजून काही नगरसेवक भाजपामध्ये येण्यास इच्छुक असल्याचे दळवी म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नगरसेवकांच्या प्रवेश सोहळय़ात उपस्थित राहणे यात काहीच गैर नाही. भाजपाचे नेते म्हणून व योगायोगाने ते गोवा डेअरीच्या कार्यक्रमासाठी फोंडय़ात आल्याने त्यांनी प्रवेश सोहळय़ाला उपस्थिती लावल्याचा खुलासा दळवी यांनी केला. फोंडय़ात भाजपाचा विस्तार जोरात सुरु आहे. मडकईतही भाजपाचा प्रभाव वाढू लागल्याने सुदिन ढवळीकरांच्या आसनाला धक्के बसू लागले आहेत. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी फोंडा पालिकेला कचरा प्रकलपासाठी जो साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला तो गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मिळणार होता. निधी हस्तांतराच्या प्रक्रियेला झालेला विलंब व त्यानंतर कोरोना आपत्तीमुळे केंद्र सरकारने खासदारांचा निधी स्थगित ठेवला होता. तेंडुलकरांनी फोंडा पालिकेला कुठलेच आमिष दाखविले नसून कचरा प्रकल्पासाठी मदत केलेली आहे. ढवळीकरांनी त्याचे राजकीय भांडवल करु नये, असा इशारा दळवी यांनी दिला.
कोरोनावर ढवळीकरांची विसंगत भूमिका
कोरोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा देण्यास राज्य सरकार कमी पडल्याचा ढवळीकर यांचा आरोपही त्यांनी फेटाळला. फोंडय़ात कोवीड इस्पितळाला तसेच शिरोडा व फर्मागुडी येथे कोरोना निगा केंद्र सुरु करण्यास मगोने विरोध केला होता. ढवळीकर एका बाजूला विरोध करतात तर दुसऱया बाजूला सरकारवर अकार्यक्षमतेची टिकाही करतात. त्यांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी असेही ते म्हणाले.
म्हादईचा प्रश्न हा गोव्याच्या अस्मितेचा प्रश्न असून भाजपा सरकार त्यावर कुठलीच तडजोड करणार नाही. मुख्यमंत्री या मुद्यावर गंभीर असल्याने न्यायालय व अन्य माध्यमातून त्यांचे प्रयत्न सुरुच आहेत असे शांताराम कोलवेकर म्हणाले.