प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव मतदारसंघातील भाजपाविरोधी मतदारांची नावे मतदार यादीतून गाळण्याचा प्रयत्न राजकीय दबावाखाली पुन्हा सुरू झाल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केला आहे. असा दबाव नाकारल्यानेच केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र असलेल्या मामलेदार साईश नाईक यांची मुरगावातून तडकाफडकी बदली करण्यात आल्याचाही आरोप आमोणकर यांनी केला आहे.
यासंबंधी संकल्प आमोणकर यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यापूर्वीही मुरगाव मतदारसंघातील 1200 भाजपाविरोधी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचे प्रयत्न झाले होते. त्यावेळी निवडणुक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. आता पुन्हा राजकीय दबावाखालीच असा प्रयत्न पुन्हा सुरू झाल्याचा आरोप संकल्प आमोणकर यांनी केला व स्थानिक आमदार तसेच नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांना लक्ष्य केले. आपण सत्ताधारी आमदारांचा हा प्रयत्न कदापी सफल होऊ देणार नाही. भाजपाला येणारी पालिका निवडणुक तसेच मुरगावातून पुन्हा जिंकून येण्याची भिती वाटत असल्यानेच गैरमार्गाने भाजपाविरोधी मतदारांची नावे गाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा आमोणकर यांनी केला आहे. मुरगावचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार व बीएलओ हे राजकीय दबावाखाली काम करीत असून मुरगाव मतदारसंघातील भाजपाविरोधी अशी 800 नावे गाळण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपा आपल्या सत्तेचा गैरवापर करीत आहे. मात्र, शासकीय अधिकाऱयांनी राजकीय दबावाला बळी पडू नये असे आवाहन आमोणकर यांनी केले आहे. यापूर्वी 1251 मतदारांची नावे संबंधीत मतदारांना अंधरात ठेवून गाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी मामलेदार कार्यालयावर मोर्चा न्यावा लागला होता. हाताही अशाच हालचाली आढळून आल्या आहेत. याच प्रयत्नातून मुरगावचे मामलेदार म्हणून काम पाहणारे साईश नाईक यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. मामलेदार साईश नाईक यांनी राजकीय दबाव झुगारल्यानेच त्यांना हटवण्यात आले. साईश नाईक हे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव असून श्रीपाद नाईक यांनीच मिलिंद नाईक यांना आमदार होण्याची संधी दिली होती असे आमोणकर म्हणाले.
प्रत्यक्षात बीएलओकडून मामलेदार कार्यालयाला मतदारांची नावे देण्यात येतात. त्यानंतर मामलेदार कार्यालयाकडून या नावांची शहानिशा व सर्वेक्षण करण्यात येते. सध्या उलटी परिस्थिती निर्माण झालेली असून मामलेदार कार्यालयच बिएलओकडे मतदारांची नावे सपुर्द करतात आणि कोणत्याही सर्वेक्षणावीना ती नावे गाळण्यात येतात असा आरोप आमोणकर यांनी केला. पूर्वीच्या जागी असो वा नसो भाजपा समर्थक मतदारांची नावे मात्र मतदार यादीत सुरक्षीत ठेवण्याची काळजी घेतली जाते असे आमोणकर यांनी म्हटले आहे.