वार्ताहर / जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रारंभ केला असून शंकरपेठ नजीकच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
जांबोटी-खानापूर या 18 कि. मी. रस्त्याचा समावेश जत्त-जांबोटी राज्य महामार्ग क्र. 31 अंतर्गत होतो. हा खानापूर तालुक्यातील आंतरराज्य वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाचा मार्ग म्हणून गणला जातो. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यापैकी कान्सुली फाटा ते नागुर्डा तसेच शंकरपेठ चढतीजवळील मलप्रभा नदीनजीकच्या पश्चिमेकडील बाजूच्या रस्त्याची पार दुर्दशा झाल्यामुळे हा रस्ता वाहतुकीअयोग्य बनल्यामुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या रस्त्याला वाली कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात होता.
या संदर्भात दै. ‘तरुण भारत’मधून शुक्रवार दि. 18 डिसेंबरच्या अंकात जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची दुर्दशा या मथळय़ाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.
सदर वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात शंकरपेठ चढतीनजीकच्या पश्चिमेकडील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत
आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने कान्सुली फाटा ते नागुर्डा-विश्रांतवाडी पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील तातडीने हाती घेऊन खराब रस्त्यामुळे वाहनधारकांची होणारी गैगसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.