धुळीचे लोळ … नागरिक हैराण
बेळगाव / प्रतिनिधी
रस्त्यांच्या विकासासाठी केलेली खोदाई… जलवाहिनींसाठी खोदलेले रस्ते… गटारी व डेनेज वाहिनीसाठी खोदाई.. रस्त्यांच्या मध्यभागी असलेले मोठे खड्डे… एका बाजूला मातीचे ढिगारे… यामुळे शहरातील रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत. मातीचे ढिगारे आणि खड्डय़ांतून उडणाऱया मातीमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून या धुळीत बेळगावकरांचा श्वास कोंडताना दिसत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांसह इतर रस्त्यांचा स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास साधण्यात येत आहे. त्यामुळे रस्ता कामाबरोबरच इतर विकासासाठी खोदाई करण्यात येत आहे. रस्ताकामामुळे सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांसह नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर माती पसरल्याने धुळीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी वाहनधारकांसह पादचाऱयांना धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यात उडणारी धूळ नाका-तोंडात जाऊन आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. शहराबरोबर शहराबाहेरील रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ताकामामुळे सगळीकडे माती पसरल्याने अवजड वाहनांमुळे धुळीचे लोळ निर्माण होत आहेत. अवजड वाहनांच्या पाठीमागून येणाऱया वाहनधारकांच्या नाका-तोंडात धूळ जात असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यांचा विकास साधताना रस्त्यावरील माती व धूळ मशीनद्वारे बाजूला केली जाते. दरम्यान, रस्त्यातील धूळ मशीनच्या वाऱयासोबत इतरत्र पसरत आहे. त्यामुळे उडणाऱया धुळीचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. याबरोबरच रस्त्यावरून ये-जा करणाऱया पादचाऱयांसह वाहनधारकांना धुळीतून मार्गस्थ व्हावे लागत आहे. त्यातच काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. वाहनधारकांना धुळीबरोबर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.