उत्पादनावर आगामी काळात परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
आयातीसाठी वापरण्यात येणाऱया कंटेनरच्या संख्येत घट झाल्याने वाहनांकरता आवश्यक असणारे वाहनांचे सुटे भाग वेळेवर मिळत नसल्याने निर्मितीप्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये वाहनांच्या भागाबाबत जागतिक टंचाईचा सामना ऑटो उद्योगातील कंपन्यांना करावा लागणार आहे.
त्यामुळे ऑटो कंपन्यांना उत्पादनांचे नियोजित लक्ष्य साध्य करणे जड जाणार आहे. दुसरीकडे जलवाहतुकीचा खर्चही वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हा हा खर्चाचा भारही ऑटो कंपन्यांना झेलावा लागत असल्याचे इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीने म्हटले आहे. कोरोनानंतर उत्सवी काळामध्ये ऑटो क्षेत्राने मागणी वाढल्याने चांगली प्रगती साधली होती. वाहनांच्या मागणीत झालेली वाढ कंपन्यांना दिलासा देणारी ठरली होती. त्यामुळे वाहन मागणीत परिस्थिती सुधारत असतानाच आता कंपन्यांना इतर अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. भारताकडून निर्यात बऱयापैकी सुधारली असली तरी आयातीवर आता परिणाम होताना दिसतोय. कंटेनरच्या टंचाईमुळे आवश्यक ते सुटे भाग निवडक कंपन्यांना मिळणे जड जात आहे. आयात आणि निर्यातीमध्ये दिसणाऱया तफावतीमुळे कंटेनरच्या पुरवठय़ामध्ये अडचणी येत आहेत. निर्यात करणाऱया कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, फोक्सवॅगन, फोर्ड मोटर्स या प्रमुख कंपन्या आहेत.