देशात हिंसाचार माजविण्यासाठी खलिस्तानवाद्यांचा डाव
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात हिंसाचार माजविण्याचा खलिस्तान कमांडो फोर्स या दहशतवादी संघटनेचा कट गुप्तचर विभागाने उघडकीस आणला आहे. गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात या कटाची माहिती आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्याची हत्या करून देशभर प्रक्षोभ उसळविण्याचा हा कट आहे, असे स्पष्ट होत आहे.
भारताचा गुप्तचर विभाग खलिस्तानवाद्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बेल्जियम आणि ब्रिटनमधील काही दहशतवाद्यांनी हा कट रचला असल्याची माहिती विभागाला मिळाली आहे. खलिस्तान कमांडो फोर्स ही संघटना या दोन्ही देशांमध्ये कार्यरत असून आता तिने पुन्हा उचल खाल्ल्याचे दिसून येते.
पाकिस्ताचा हात
पाकिस्ताननेही खलिस्तान कमांडो फोर्सला सढळ हस्ते शस्त्रे आणि प्रशिक्षण साहाय्य दिले आहे. 80 च्या दशकात ही संघटना पाकिस्तानमधूनच कार्यरत होती आणि भारतात उत्पात घडविण्याची कारस्थाने आखत होती. त्या दशकात पंजाबमध्ये हिंसाचाराचा आगडोंब माजला होता. आता तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्र यत्न ही संघटना करीत असल्याचे समजले आहे.
जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न
सध्या सुरू असणाऱया शेतकरी आंदोलनामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न खलिस्तानप्रेमी दहशतवादी करीत आहेत. या आंदोलनाचा गैरफायदा उठवत गरीब शेतकऱयांच्या जमीनी बळकाविण्याचे आणि त्यांचा उपयोग दहशतवादी कृत्यांसाठी करण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यामुळे सरकारने भविष्यकाळात सावधानता आणि दक्षता बाळगणे आवश्यक आहे, असा गुप्तचर विभागाचा निष्कर्ष आहे.
गणतंत्रदिनी हिंसाचार
26 जानेवारीला गणतंत्रदिनी दिल्लीत हिंसाचार होत होता, तेव्हा अमेरिकेत खलिस्तानवाद्यांनीही भारतीय दूतावासावर मोर्चा काढला होता. हा केवळ योगायोग नव्हता. तर जगभर खलिस्तानच्या निर्मितीसाठी वातावरण निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. आतापर्यंत या प्रयत्नांमध्ये फारसे यश मिळालेले नाही. तथापि, भविष्यात दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम संभवतात, असे जाणकारांचे मत आहे.