नव्या बाधितांपैकी 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढत असून, दररोज मोठय़ा प्रमाणावर नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. याशिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. महाराष्ट्राबरोबरच केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही बाधितांचा आकडा वाढल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सर्वाधिक संसर्ग असणाऱया सहा राज्यांमध्ये तब्बल 85 टक्क्यांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत अखेरच्या चोवीस तासात देशात जवळपास 29 हजार इतके नवे बाधित सापडले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 18 हजार नवीन रुग्णांचा समावेश आहे. तसेच केरळमधील दोन हजार रुग्ण समाविष्ट आहेत.
गेल्या 24 तासात देशभरात 28 हजार 903 नवे रुग्ण सापडल्यामुळे एकंदर बाधितांचा आकडा 1 कोटी 14 लाख 38 हजार 734 वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागील 24 तासांमधील आकडेवारी पाहता देशात कोरोनामुळे 188 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 59 हजार 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मंगळवारी दिवसभरात 17 हजार 741 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 45 हजार 284 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजूनही देशात 2 लाख 34 हजार 406 सक्रिय रुग्ण असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रात चिंताजनक वाढ
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 17 हजार 864 नवीन रुग्ण आढळले. ऑक्टोबरनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. राज्यात मंगळवारी 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 996 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 9 हजार 510 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 21 लाख 54 हजार 253 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 40 हजार 079 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 23 लाख 47 हजार 328 लोकांना लागण झाली आहे.
दिवसभरात 9 लाख 69 हजार चाचण्या
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशभरात मंगळवारी दिवसभरात 9 लाख 69 हजार 21 जणांच्या कोरोना तपासणी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये जवळपास 28 हजार 903 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत देशात 22 कोटी 92 लाख 49 हजार 784 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.