सातारा तालुक्यातील सहा जणांचा मृत्यू : साठा नसल्याने लसीकरण केंद्र बंद
प्रतिनिधी / सातारा
जिह्यात बुधवारी उच्चांकी 922 कोरोना रूग्णांची वाढ झाल्याने धसका बसला असतानाच गुरूवारी 659 नव्या रूग्णांची भर पडली आहे. जिह्यात दररोज पाचशेच्या पुढे रूग्णवाढीचा आकडा येत असून सातारा शहर व तालुक्यात तब्बल 173 रूग्ण वाढले आहेत. सातारा तालुक्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरू असून 24 तासात याच तालुक्यातील सहाजणांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱयांनी घोषित केलेल्या मिनी लॉकडाऊनला विरोध कायम असून त्यांच्याकडे निवेदने, मेलवरून निर्बंध मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही गुरूवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेत निर्बंध मागे घेण्याची मागणी केली.
रूग्णवाढीबरोबरच मृत्यूही वाढले
जिल्हय़ात दुसऱया लाटेत रूग्णवाढ होत असताना मृत्यूही वाढल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालात तब्बल 9 बाधितांचा मृत्यू झाला. यात सहा जण सातारा शहर व तालुक्यातील आहेत. गेल्या सहा महिन्यात 9 बाधितांचा एकाच दिवशी मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात हामदाबाद (ता. सातारा) येथील 65 वर्षीय महिला, गांजे (ता. जावली) येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (ता. सातारा) येथील 89 वर्षीय महिला, नांदोशी (ता. खटाव) येथील 63 वर्षीय पुरुष, गडकरआळी (ता. सातारा) येथील 76 वर्षीय पुरुष, आंबवडे (ता. सातारा) येथील 65 वर्षीय महिला व खासगी हॉस्पीटलमध्ये वाई येथील 82 वर्षीय पुरुष, करंजे पेठ (ता. सातारा) येथील 78 वर्षीय पुरुष, खेड (ता. सातारा) येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
साताऱयात तासाला सात जण बाधित
गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालात 659 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक बाधित 173 सातारा शहर व तालुक्यात आढळले आहेत. हॉटस्पॉट साताऱयात वेगाने वाढ होत आहे. चोवीस तासातील बाधितांचा वेग पाहता सातारा शहर व तालुक्यात तासाला सात जण बाधित झाल्याचे दिसत आहे. या तालुक्यात अधिक खबरदारी आवश्यक आहे. पुणे विभागात पुण्यानंतर सातारा शहरात सर्वाधिक बाधित सापडत आहेत. दरम्यान, आजच्या अहवालात फलटणला 74, कोरेगावला 72, कराडला 49, खंडाळ्यात 89, वाईत 43, महाबळेश्वरला 29, जावली 23, पाटणला 21, खटावला 19, माणला 13 असे रूग्ण बाधित आढळले आहेत.
निर्बंध हटवण्यासाठी निवेदनांचा खच
जिल्हय़ातील मिनी लॉकडाऊनला व्यापाऱयांचा विरोध आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठय़ा प्रमाणात निवेदने दिली जात असून ऑनलाईन व मेलद्वारेही निवेदने पाठवली जात आहेत. अनेक व्यापारी शिष्टमंडळे जिल्हाधिकाऱयांना भेटत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यापाऱयांसह जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली. एकुण निर्बंध मागे घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयांवर दबाव वाढला आहे.
सप्लाय चेनवर ताण; प्रशासनाचे लक्ष
जिल्हय़ात वेगाने वाढणारा संसर्ग पाहता सर्वच प्रकारच्या आरोग्य यंत्रणावर ताण वाढत असून येत्या काही दिवसांत तो आणखी वाढण्याची शक्यता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्हीडीओ संदेशात वर्तवली आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा पुरवठा, बेडची उपलब्धता याबरोबरच लसीकरण याबाबतच्या सप्लाय चेनवर प्रशासनाचे लक्ष आहे. यात विस्कळीतपणा आला तरीही पुरवठा करण्यास प्रशासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्हय़ात 180 केंद्रांवरील लसीकरण थांबले
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी गुरूवारपासून लशीचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम स्थगित करत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार गुरूवारी 180 केंदांवरील लसीकरण बंद होते. काही केंद्रांवर शिल्लक डोस होते. ते दिल्यानंतर लसीकरण बंद झाले. लसीच्या साठा कधी येणार, याकडे जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे.
327 नागरिकांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 327 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. रूग्णवाढ होत असताना डिस्चार्जही वाढला आहे.
गुरूवारी जिल्हय़ात
- एकूण बाधित 659
- एकूण मुक्त 327
- एकूण बळी 09
- गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
- एकूण नमुने -425119
- एकूण बाधित -70796
- घरी सोडलेले -62569
- मृत्यू -1945
- उपचारार्थ रुग्ण-6282
लसीकरणानंतर नियमांचे पालन काटेकोरपणे करा
जिल्हा माहिती कार्यालय, साताराद्वारा जनहितार्थ प्रकाशित व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे स्वतःला, प्रियजनांना व सहकाऱयांना लसीकरणानंतरही सुरक्षित ठेवण्यासाठी कोविड अनुरूप पाच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये योग्य पध्दतीने मास्क वापरा, हात साबण आणि पाण्याने वारंवार आणि नियमितपणे धुवा/हँड सॅनेटायझरचा वापर, सहा फुटांचे अंतर राखा, कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरीत स्वतःचे विलगीकरण करा, कोणतेही लक्षण अढळल्यास ताबतोब टेस्ट करा, या पाच नियमांचे पालन लसीकरणानंतर काटेकोर पणे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण ‘जर आपण सुरक्षित तर देश सुरक्षित’ यासंबंधी अधिक माहिती करीता हेल्पलाईन 1075, 104, 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ही करण्यात आले आहे.