खासदार संजय राऊत यांचे आवाहन, म. ए. समितीच्या शुभम शेळके यांना दिल्लीत पाठवा
प्रतिनिधी / बेळगाव
सीमाभागातील मराठी भाषिकांच्या एकजुटीने राष्ट्रीय पक्षांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. समितीचा सिंह या एकजुटीमुळे नक्कीच लोकसभेत प्रवेश करणार आहे. आता एकच प्रश्न आहे या लढय़ाचा आवाज बुलंद करण्याचा. पंतप्रधानांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पहायला हवं. 65 वर्षे भरडणाऱया सीमावासियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला स्वातंत्र्याचा हक्क मिळवून द्यायला हवा. सीमाभाग कर्नाटकात डांबण्याची चूक पं. नेहरुंनी केली असे म्हणत असाल तर ती चूक तुम्ही दुरुस्त करा, असे आवाहन शिवसेना नेते, राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केले. शुभम शेळके हा आता खासदार झाला आहे हे लक्षात ठेवा, असेही ते आपल्या भाषणात ठामपणे म्हणाले.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या सिंह या चिन्हाला बळकटी देण्यासाठी शिवसेनेचे संजय राऊत बेळगावला आले होते. भव्य प्रचारफेरीत सहभागी होऊन त्यानंतर झालेल्या भव्य प्रचारसभेत त्यांनी आपली तोफ डागली. सीमाभागात बऱयाच वर्षांनी आता वाघ-सिंहाचा खेळ सुरू झाला. आता माकडांचे वांदे झालेत, असे ते म्हणाले. यावेळी हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी माझं काही देणं घेणं नाही. कारण त्यांचं अस्तित्व जे केंद्रातील लोक ठरवितात त्यांच्याशी आमचा लढा आहे. या लढय़ात महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन समाज आणि सारेच पक्ष आमच्या सोबत आहेत. मात्र शुभमच्या विरोधात उभा असलेला प्रमुख भाजप पक्ष या लढय़ात महाराष्ट्रात कितपत साथ देतोय, हे सांगता येत नाही. शिवसेनेने सीमाप्रश्नी आपले रक्त सांडले आहे. या रक्ताची शपथ घेऊन आज शुभमला लोकसभेत पाठविण्याची खरी गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कर्नाटकची नांगी आवळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. या राज्याच्या पाण्याची चावी आमच्या हातात आहे. मात्र तेथेही आम्ही माणुसकीचा धर्म पाळतो. हे कर्नाटकातील त्या नेत्यांनी विसरू नये. येथे पाठीवर लाठय़ा पडल्या की कुठे बांबू मारायचा हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा जपला आहे. अशावेळी सीमाभागात होणारा शिवराय आणि भगव्याचा अवमान यापुढे कदापी सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सीमाप्रश्नी लढलेल्या नेत्यांचे स्मरण….
संजय राऊत यांनी सीमाप्रश्नाच्या लढय़ाचा उल्लेख करतानाच 65 वर्षांपूर्वी सीमाप्रश्नी लढलेल्या नेत्यांचे स्मरण केले. बॅ. नाथ पै हे बेळगावातच हुतात्मा झाले. या लढय़ात बाबुराव ठाकुर, बळवंतराव सायनाक, याळगी यांची नावे आजही आठवतात. त्यांच्याच प्रेरणेतून आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विजयी संदेश घेऊन मी येथे आलो आहे. सीमाभागातल्या मराठी जनतेला दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत बऱयाच प्रकारे नांगी आवळू शकतो. मात्र आमची मराठी संस्कृती माणुसकी सांगते. त्यामुळे आम्हाला ते करायचे नाही आणि तसे करण्याची वेळही आणून देऊ नका, अशा रोखठोक शब्दात त्यांनी समाचार घेतला.