ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल न्यायालयाने पुन्हा एकदा केंद्र सरकारला फटकारले. न्यायालयाने केंद्राला सांगितले की, देशातील ऑक्सिजनच्या कमतरतेकडे तुम्ही डोळेझाक करू शकता, पण आम्ही नाही.
आज देशातील अनेक कोरोना रुग्ण ऑक्सिजन अभावी तडफडून मरत आहेत. जर तुम्ही ऑक्सिजन पुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन करत नसाल, तर तुम्ही आयआयटी आणि आयआयएमवर जबाबदारी का सोपवत नाही? ऑक्सिजन टँकरचे व्यवस्थापन आयआयटी किंवा आयआयएमकडे सोपवल्यास तुम्ही अधिक चांगले काम कराल, असे कोर्टाने केंद्राला सांगितले.
दरम्यान, दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्यास न्यायालयाने केंद्राला सांगितले आहे. जर तुम्ही पुरवठा केला नाही, तर तो न्यायालयाचा अवमान होईल. सध्या महाराष्ट्रात ऑक्सिजनचा वापर कमी होत असल्यास काही टँकर दिल्लीला पाठवता येतील, असेही उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले.